फडणवीस-गडकरींपुढे विश्वस्त निवडीचा पेच
By Admin | Updated: January 14, 2015 00:46 IST2015-01-14T00:46:59+5:302015-01-14T00:46:59+5:30
नासुप्रच्या विश्वस्तपदी कोणत्या ‘विश्वासू’ची नियुक्ती करायची असा पेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर

फडणवीस-गडकरींपुढे विश्वस्त निवडीचा पेच
‘एनएमआरडीए’ स्थापनेच्या प्रक्रियेमुळे विलंबाची शक्यता
नागपूर : नासुप्रच्या विश्वस्तपदी कोणत्या ‘विश्वासू’ची नियुक्ती करायची असा पेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर निर्माण होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेच्या सत्तापक्ष नेतेपदासाठी सहा महिने रस्सीखेच सुरू राहिली. त्यामुळे आता विश्वस्तपदी नियुक्ती करताना नेत्यांना जपून पावले टाकावी लागणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक सदस्य गडकरींच्या पसंतीने तर दुसरा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पसंतीने नियुक्त होईल. तर, आमदारांमधून होणारी नियुक्ती संयुक्त संमतीने होईल, असे मानले जात आहे. मात्र, असे असले तरी नासुप्रचे एनएमआरडीएमध्ये रूपांतर करण्याची सुरू असलेली प्रक्रिया पाहता विश्वस्तांची निवड होण्यासाठी आणखी चार- ते सहा महिने लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्य शासनातर्फे नासुप्रवर तीन सदस्यांची नियुक्ती केली जायची. यातील एक आमदारांमधून व उर्वरित दोन सदस्यांसाठी निवडीचे बंधन नव्हते. आघाडी सरकारमध्ये आमदारांमधून दीनानाथ पडोळे यांना ती संधी मिळाली होती. आ. सुधाकर कोहळे यापूर्वी नासुप्रचे विश्वस्तपद भूषविले आहे. भाजपचे शहर अध्यक्ष असलेले आ. कृष्णा खोपडे हे स्वत:च या पदासाठी फारसे इच्छुक नाहीत. त्यामुळे आ. सुधाकरराव देशमुख किंवा आ. डॉ. मिलिंद माने यांच्यापैकी एकाला ही संधी मिळू शकते. उर्वरित दोन जागा काँग्रेस व राष्ट्रवादीने आपसात वाटून घेतल्या होत्या. काँग्रेस नेते अनंतराव घारड व राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते आणि सध्या शिवसेनावासी झालेले किशोर कन्हेरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. सध्या राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आहे. त्यामुळे आघाडी सरकारने लागू केलेला फार्म्युला युती सरकारनेही लागू केला तर विश्वस्ताचे एक पद शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता नाही. मात्र, भाजपमध्ये इच्छुकांची यादी मोठी असल्यामुळे विश्वस्तांची दोन्ही पदे स्वत:कडे ठेवून शिवसेनेला दुसरीकडे ‘अॅडजस्ट’ करण्याची खेळी भाजपकडून खेळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे नगरसेवक मुन्ना यादव हे विश्वस्त पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. महापालिकेत सत्तापक्षनेते पदासाठी बरीच रस्सीखेच झाली. सहा महिने ओढाताण सुरू राहिली. शेवटी स्पर्धेत नसलेले पण अनुभवी असलेले दयाशंकर तिवारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. या पदासाठी इच्छुक असलेले गिरीश देशमुख, सुनील अग्रवाल आदींचा हिरमोड झाला. त्यामुळे आता विश्वस्त पदासाठी गिरीश देशमुख, सुनील अग्रवाल यांची नावे आघाडीवर आहेत. नगरसेवक भूषण शिंगणे, रमेश शिंगारे यांचेही नाव स्पर्धेत आहे. (प्रतिनिधी)
फक्त नगरसेवकांनाच एन्ट्री
आजवर महापालिकेत नगरसेवक नसलेल्या व्यक्तीचीही विश्वस्तपदी निवड केली जात होती. पण आता मात्र फक्त नगरसेवकांनाच ही संधी मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार महापालिकेच्या हद्दीत येणारा भाग वगळून मेट्रोरिजनअंतर्गत येणाऱ्या भागाची जदबाबदारी नासुप्रकडे सोपविली जाणार आहे. हे करताना एमएमआरडीएच्या धर्तीवर एनएमआरडीएची स्थापना केली जाणार आहे. एमएमआरडीएमध्ये विश्वस्तपदी फक्त लोकनियुक्त नगरसेवकांनाच विश्वस्तपदी संधी देण्याची तरतूद आहे. हीच तरतूद एनएमआरडीएला देखील लागू राहील. याचा फायदा नगरेवकांना होणार असून पक्षासाठी झटणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांसाठी मात्र नासुप्रची दारे बंद होणार आहेत.