एक्झिट पोलचे अंदाज फोल!
By Admin | Updated: May 17, 2014 04:50 IST2014-05-17T04:50:14+5:302014-05-17T04:50:14+5:30
एक्झिट पोलचे अंदाज पुन्हा एकदा फोल ठरल्याचे १६ व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले आहे.

एक्झिट पोलचे अंदाज फोल!
जयशंकर गुप्त, नवी दिल्ली - एक्झिट पोलचे अंदाज पुन्हा एकदा फोल ठरल्याचे १६ व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले आहे. केवळ ‘टुडे चाणक्य’ला या वेळीही प्रत्यक्ष निकालाच्या जवळ जाणारे भाकीत वर्तवण्यात यश आले. चाणक्यने डिसेंबरमध्ये चार राज्यांतील विधानसभा तसेच त्याआधी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील विधानसभा निवडणुकीतही वर्तवलेला अंदाज अचूक ठरला होता. अन्य टीव्ही वाहिन्या आणि विविध संस्थांनी पार पाडलेल्या एक्झिट पोलचे अंदाज प्रत्यक्ष आकडेवारीच्या कितीतरी दूर असल्याचे आढळून आले. टाइम्स नाऊ या वाहिनीने ओआरजीच्या हवाल्याने भाजपाला २१०, रालोआला २४९, काँग्रेसला १०५, संपुआला १३५ तर अन्य पक्षांना १५१ जागा मिळण्याचे भाकीत वर्तवले होते. ओआरजीने आता टाइम्स नाऊसाठी कोणतेही एक्झिट पोल घेतले नसल्याचे सांगत नव्या वादाला जन्म दिला आहे. सीएनएन-आयबीएनसाठी सीएसडीएने पार पाडलेल्या सर्वेक्षणात भाजपाला २३६, रालोआला २७६, काँग्रेसला ७७ तर संपुआला ९७ जागांचा अंदाज वर्तवला होता. आज तकसाठी सीसेरोने घेतलेल्या सर्वेक्षणात रालोआला २७२, संपुआला ११५ तसेच अन्य पक्षांना १६५ जागा दर्शविल्या होत्या. एबीपीसाठी ए.सी. निल्सनने पार पाडलेल्या सर्वेक्षणात रालोआला २८१, संपुआला ९७ तसेच अन्य पक्षांना १६५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला. इंडिया टीव्हीसाठी सी व्होटरने घेतलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणात भाजपाला २५०, रालोआला २८९, काँग्रेसला ७८, संपुआला १०१ तर अन्य पक्षांना १४८ जागा दर्शविल्या होत्या. एनडीटीव्हीसाठी हंसाने पार पाडलेल्या सर्वेक्षणात भाजपाला २३५, रालोआला २७९, काँग्रेस ७९, संपुआ १०३ तर अन्य पक्षांना १६१ जागा मिळेल, असे भाकीत वर्तवले होते.