शाळांमध्ये उत्साह, पण अडचणींचे काय?
By Admin | Updated: September 2, 2014 01:06 IST2014-09-02T01:06:07+5:302014-09-02T01:06:07+5:30
शिक्षकदिनाच्या औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावे असे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. उपराजधानीतील अनेक शाळांमध्ये

शाळांमध्ये उत्साह, पण अडचणींचे काय?
पंतप्रधानांचा थेट संदेश : शिक्षक संघटनांकडून संमिश्र प्रतिक्रिया
नागपूर : शिक्षकदिनाच्या औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावे असे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. उपराजधानीतील अनेक शाळांमध्ये यासंदर्भात उत्साह असला तरी काही शाळांसमोर या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. उपराजधानीतील निरनिराळ्या शिक्षक संघटनांकडूनदेखील यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत.
सुमारे शंभर दिवसांपूर्वी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकदिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे पावणेदोन तास ते देशभरातल्या सर्वच शाळकरी विद्यार्थ्यांशी संपर्क साधणार आहेत. पंतप्रधानांचा संदेश विद्यार्थ्यांना पाहता यावा यासाठी सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना दुपारी अडीच ते पावणे पाच या वेळेत एकत्रित जमवून कार्यक्रम पाहण्याची व्यवस्था करावी असे निर्देश शिक्षण उपसंचालकांकडून शाळांना देण्यात आले आहेत.
या कार्यक्रमास इयत्ता पहिली ते दहावीचे सर्व विद्यार्थी, शिक्षक यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या शाळेत टी.व्ही. नाही, अशा शाळांमध्ये मुख्याध्यापक किंवा संबंधित शाळेच्या व्यवस्थापन समितीने टी.व्ही. उपलब्ध करून द्यावा, विद्युतपुरवठा खंडित झाला असेल तर जनरेटरची व्यवस्था करावी, शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यांला हे भाषण ऐकता यावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
ज्या शाळांमध्ये टीव्ही, संगणक यांची व्यवस्था आहे तेथे या संदेशाबाबत उत्साह दिसून येत आहे. परंतु अनेक विनाअनुदानित शाळांमध्ये टीव्ही संच, संगणक यांची व्यवस्था नाही. (प्रतिनिधी)