राज्यात प्रत्येक जिल्ह्यात साजरा होणार ‘उद्योग दिन’
By Admin | Updated: January 27, 2015 23:41 IST2015-01-27T23:41:44+5:302015-01-27T23:41:44+5:30
विश्वकर्मा जयंती दिनी आयोजन; एका व्यासपीठावर येणार अवघे उद्योग जगत.

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात साजरा होणार ‘उद्योग दिन’
अकोला: राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी, प्रत्येक जिल्ह्यात उद्योग दिन साजरा करण्याचा निर्णय, राज्याच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाने घेतला आहे. मंगळ्वार, दिनांक २७ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार, उद्योग जगताला एका व्यासपीठावर आणण्यासाठी, विश्वकर्मा जयंती दिनी विविध कार्यक्रम व प्रदर्शनांचे आयोजन केले जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाने २0१३ मध्ये जाहीर केलेल्या औद्योगिक धोरणानुसार, राज्याचा औद्योगिक विकास घडवून, आर्थिक विकास साधण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी नवीन उद्योग घटकांच्या स्थापनेला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. नवीन उद्योग घटकांच्या स्थापनेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने सुक्ष्म, लघू व मध्यम उपक्रमांना, त्यांची उत्पादने व क्षमतांचे प्रदर्शन घडविता यावे यासाठी, सामाईक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शानसाने घेतला आहे. प्रत्येक जिल्यात असे व्यासपीठ वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध करून दिले जाईल. त्यासाठी विश्वकर्मा जयंती दिनी प्रत्येक जिल्ह्यात उद्योग दिन साजरा करण्याचे निर्देश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दिले आहेत.
*जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समिती
उद्योग दिनाचे आयोजन करण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सल्लागार समिती गठित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी त्यांच्या स्तरावर उद्योग दिनाचे नियोजन, समन्वय व सनियंत्रण करण्यासाठी उप समिती गठित करतील.
*राज्य शासन देणार निधी
उद्योग दिनाचे आयोजन करण्यासाठी आणि जिल्हा पातळीवरील पुरस्कारांचे वितरण करण्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याकडून आयोजनानुसार निधीची मागणी करण्यात आल्यानंतर, निधी उपलब्ध करून दिला जाईल.