रस्त्यावरची पोरं सर्वेक्षणानंतरही शालाबाह्यच
By Admin | Updated: October 30, 2015 00:31 IST2015-10-30T00:31:47+5:302015-10-30T00:31:47+5:30
पोरांली शिकवण्याची लय इच्छा हाय; पण येथे पोटाची रोजची खळगी भरणंच कठीण... रस्त्यावर फुगं, खेळणी ईकून शे-दीडशे रुपये मिळतात... पोरं बी तेच करतात...

रस्त्यावरची पोरं सर्वेक्षणानंतरही शालाबाह्यच
पुणे: पोरांली शिकवण्याची लय इच्छा हाय; पण येथे पोटाची रोजची खळगी भरणंच कठीण... रस्त्यावर फुगं, खेळणी ईकून शे-दीडशे रुपये मिळतात... पोरं बी तेच करतात... शासनाने सर्वे केल्यानंतर वाटलं होतं आता आपली पोरं शाळेत जातील, पर सर्वे होऊन चार महिने झाले... पोरांली शाळेत घ्यायाला कोणी फिरकलंच नाही... मग्ां काय पोरं पुन्हा रस्त्यावरच आमच्यासोबत फुगे इकत्यात... रस्त्यावरच्या पोरांच्या नशिबी कसली आली शाळा नी काय.. ही उद्िवग्न प्रतिक्रिया आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून पुणे शहरात आलेल्या गणपत लक्ष्मण पवार या पालकाची.. गणपत पवार यांना दोन मुले व एक मुलगी आहे. विशी-पंचविशीत असलेल्या या तरुणाला आपल्या मुलांना शिकवण्याची खूप इच्छा आहे. पण परिस्थितीपुढे हतबल असल्याने मुलांना शिकवू शकत नाही. शासनाच्या वतीने जुलै महिन्यात करण्यात आलेल्या शालाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात हजारो मुले शालाबाह्य असल्याचे समोर आले. पण या सर्व्हेनंतर या मुलांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले.
गाजावाजा करून शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले खरे; पण सरकारी यंत्रणेच्या मानसिकतेप्रमाणे केवळ कागदोपत्रीच शंभर टक्के सर्वेक्षण करण्यात आले. अद्यापही हजारो मुले शालाबाह्य असून, शासनाच्या सर्वेक्षणात त्याचा समावेश नाही. सर्वेक्षण झाल्यानंतर शालाबाह्य असणाऱ्या मुलांना शाळेत दाखल करून घेणे अपेक्षित होते; पण शासन केवळ टाइमपास करत असून, गरीब, असहाय मुलांच्या भावनांशी खेळ करत आहे.
- बस्तु रेगे, दगडखाण कामगारांच्या मुलांसाठी काम करणारे कार्यकर्ते
शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या शालाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणानंतर त्वरितच सर्व संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना त्या-त्या परिसरातील मुलांना लगतच्या शाळेत दाखल करून घेण्याचे आदेश दिलेले आहेत. मुलांना शाळेत दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरूच आहे.
-दिनकर टेमकर (शिक्षण उपसंचालक)