स्वतंत्र संस्था स्थापन करा
By Admin | Updated: August 3, 2016 05:32 IST2016-08-03T05:32:55+5:302016-08-03T05:32:55+5:30
उपनगरीय रेल्वेसाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्याची गरज असल्याची महत्त्वपूर्ण सूचना कॅग अहवालातून करण्यात आली आहे.

स्वतंत्र संस्था स्थापन करा
मुंबई : वाढत जाणारी प्रवासी संख्या, त्यामुळे सध्याच्या रेल्वे सेवेवर सोयीसुविधांचा पडणारा ताण आणि होणारा तोटा पाहता देशभरातील काही उपनगरीय रेल्वेसाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्याची गरज असल्याची महत्त्वपूर्ण सूचना कॅग अहवालातून करण्यात आली आहे. प्रवासी सुविधा वाढविण्यावर आणि सुरक्षेवरही भर देण्याचे या अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल नुकताच संसदेसमोर ठेवण्यात आला.
देशभरातील उपनगरीय रेल्वेच्या कामगिरीची माहिती घेऊन त्याचा अहवाल ‘कॅग’कडून (नियंत्रक व महा लेखापरीक्षक) तयार करण्यात आला. यासाठी देशभरातील मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वेबरोबरच अन्य पाच क्षेत्रीय रेल्वेच्या २0१0 ते २0१५ या कालावधीतील प्रवासी सुविधा, सुरक्षा, अपघात अन्य माहिती घेण्यात आली आहे. सध्याच्या लोकलची प्रवासी क्षमता वाढवितानाच त्याच्या फेऱ्या वाढविण्यावर रेल्वे यंत्रणांनी भर दिला पाहिजे. जेणेकरून प्रवास सुकर होईल, अपघात कमी होतील व लोकलचे वेळापत्रकही सुधारण्यास मदत होईल, अशी सूचना या अहवालातून केली आहे. प्रवाशांच्या सुविधा आणि सुरक्षेवरही उपनगरीय रेल्वे यंत्रणेने भर देणे आवश्यक असल्याचे सांगतानाच इंटिग्रेटेड सिक्युरिटी यंत्रणा सगळ्या स्थानकांवर उपलब्ध करावी. यात चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर याचा समावेश करावा. सुरक्षेवरील ताण कमी करायचा असल्यास महत्त्वाच्या स्थानकांतील अनधिकृत ‘एन्ट्री-एक्झिट’ मार्ग बंद करण्यात यावेत. जेणेकरून सुरक्षेवरील ताण कमी होईल, अशी सुरक्षेसंदर्भातील महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे. सध्या रेल्वेचे उत्पन्न कमी आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी रेल्वेने अनेक उपाययोजना केल्या पाहिजेत. उत्पन्नाचे स्रोत उभे करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत सुविधा, सुरक्षा व उत्पन्नासाठी एक वेगळी संस्था उपनगरीय रेल्वे यंत्रणेसाठी स्थापन करण्याची सूचना कॅग अहवालातून केली आहे. (प्रतिनिधी)
>अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना
अपघात कमी करण्यासाठी फेऱ्या वाढविणे, प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे, रुळांजवळील झोपड्यांच्या लगत कुंपण उभारण्यास सांगितले आहे.
कॅग अहवालातून उपनगरीय
रेल्वे यंत्रणांवर ताशेरे ओढतानाच प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्यात अनेक त्रुटी असल्याचे नमूद केले आहे.