मतदान वाढल्यास सदृढ लोकशाही प्रस्थापित
By Admin | Updated: January 16, 2017 01:28 IST2017-01-16T01:28:54+5:302017-01-16T01:28:54+5:30
पिंपरी-चिचवड महापालिकेची निवडणूक फेबु्रवारी महिन्यात होणार आहे.

मतदान वाढल्यास सदृढ लोकशाही प्रस्थापित
पिंपरी : पिंपरी-चिचवड महापालिकेची निवडणूक फेबु्रवारी महिन्यात होणार आहे. निवडणूक तयारी सुरू आहे. मतदारयादी अद्ययावतीकरण, प्रारूप मतदारयादी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये, आदर्श आचारसंहितेचे पालन सुरू झाले आहे. सुदृढ लोकशाहीसाठी मतदान टक्केवारी वाढण्याची गरज आहे. त्यामुळे मतदानाचा अधिकार मिळालेल्या प्रत्येक नागरिकाने तो बजावयास हवा, आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. असे सांगत होते, महापालिका निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने.
महापालिका निवडणूक तयारीविषयी सांगा?
- पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २१ फेब्रुवारीला होत आहेत. त्यासंबंधीचे नियोजन केले आहे. बहुसदस्यीय पद्धतीने ही निवडणूक होणार असून, १२८ वॉर्डचे ३२ प्रभाग असणार आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार ही निवडणूक होणार आहेत. त्यासाठी सुमारे १२ लाख मतदार असणार आहेत. मतदान, मतमोजणी यासाठी शहरातील विविध भागात ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. सुमारे १० हजार कर्मचारी या कामासाठी आवश्यक असणार आहेत. निवडणूक कामकाजाच्या सोयीसाठी सुमारे २० कक्ष कार्यान्वित केले आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्याही झाल्या आहेत. प्रारूप प्रभाग अंतिम झाल्यानंतर प्रारूप मतदारयादी प्रकाशित केली आहे. यावरील हरकतींसाठी १७ जानेवारीपर्यंत मुदत आहे. प्रभागनिहाय विभाजन केलेली मतदारयादी २१ जानेवारीला प्रकाशित केली जाणार आहे. निवडणूक कार्यालयांचेही कामकाज सोमवारपासून सुरू होणार आहे. तिथे सुविधांची सज्जता असणार आहे.
निवडणुकीत यंदाचे वेगळेपण काय असेल?
- महापालिका निवडणुकीसाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ट्रू वोटर अॅप राज्य निवडणूक आयोगाने नागरिक, मतदार, राजकीय पक्ष, उमेदवार यांच्यासाठी ट्रू वोटर अॅप सुरू केले आहे. या अॅपची मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी मदत होणार आहे. तसेच उमेदवारीअर्ज भरणे यासाठी आॅनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. उमेदवारांना शपथपत्राद्वारे भरलेली माहिती पाहता येणार आहे. तसेच दैनंदिन खर्चही सादर करता येणार आहे. त्यामुळे उमेदवार आणि मतदारांची सोय होणार आहे. वेळेची बचत होणार आहे. तसेच अधिक पारदर्शी निवडणूक करण्यासाठी या सुविधा पूरक ठरणार आहेत.
निर्भय निवडणुकीसाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत?
- निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. विविध उपाययोजना करण्यात आल्या असून, आचारसंहिता कक्षाची स्थापना झाली आहे. आचारसंहितेच्या अनुषंगाने भरारी पथक, चेक पोस्ट पथक, व्हिडीओ सर्व्हिलन्स पथक नियुक्त केले जाणार आहे. पोलिसांच्या मदतीने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या हालचालींवर निवडणूक आयोगाचे लक्ष असणार आहे. गुन्हेगारीकरण होत असल्यामुळे या वेळेस प्रथमच निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शपथपत्रातील संपत्तीची, गुन्ह्याची माहिती अऊफ या संस्थेच्या माध्यमातून महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे.
मतदारजागृती अभियानाबद्दल?
मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदारांना आवाहन केले आहे. १९९२ मध्ये मतदानाची टक्केवारी ६० होती. त्यानंतर १९९७ मध्ये ६८ टक्के, २००२ मध्ये ५९.५१, २००७ मध्ये ५५.१७ आणि २०१२ मध्ये ५४.८४ टक्के होती. मतदानांची ट्क्केवारी वाढल्यास सदृढ लोकशाही निर्माण होण्यास मदत होणार आहे. नवमतदार नोंदणी चांगल्याप्रकारे झाली आहे.
शब्दांकन : विश्वास मोरे