द्वेषातून केला ‘युग’चा अंत
By Admin | Updated: September 4, 2014 01:00 IST2014-09-04T01:00:11+5:302014-09-04T01:00:11+5:30
लकडगंज गुरुवंदना सोसायटी येथील युग चांडक या आठ वर्षीय चिमुकल्याचे केवळ द्वेष भावनेतून अपहरण करून खून करण्यात आल्याचे सत्य उजेडात आले आहे.

द्वेषातून केला ‘युग’चा अंत
क्रूरपणे हत्या : आरोपींना १२ दिवसांची पोलीस कोठडी
नागपूर : लकडगंज गुरुवंदना सोसायटी येथील युग चांडक या आठ वर्षीय चिमुकल्याचे केवळ द्वेष भावनेतून अपहरण करून खून करण्यात आल्याचे सत्य उजेडात आले आहे.
दरम्यान बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास दोन्ही आरोपींना कडेकोट पोलीस बंदोबस्तात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी.एस. शर्मा यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला.
राजेश धनालाल दवारे (१९) रा. वांजरी ले-आऊट कळमना आणि अरविंद अभिलाष सिंग (२३) रा. प्रीती ले-आऊट, नारा रोड जरीपटका, अशी आरोपींची नावे आहेत.
चिमुकल्याने उजेडात आणले घोटाळे अन्...
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, क्रूरकर्मा राजेश दवारे हा महाविद्यालयीन शिक्षण घेऊन डॉ. मुकेश चांडक यांच्या सेंट्रल एव्हेन्यू रोड दोसरभवन चौकातील ‘डेंटल क्लिनिक’मध्ये अटेन्डन्ट कम क्लर्क म्हणून ‘पार्ट टाईम जॉब’ करीत होता.
सेंटर पॉर्इंट शाळेत दुसऱ्या वर्गात शिकणारा युग हा हुशार व तल्लख बुद्धीचा होता. संगणक खेळण्यात पटाईत होता. तो राजेशच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवायचा आणि वडिलांना सांगायचा.
राजेश हा क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांकडून आगाऊ पैसे वसूल करायचा. संगणकातील पैशाबाबतच्या अनेक नोंदी त्याने गहाळ केल्या होत्या. युग हा संगणकावर खेळत असताना अचानक त्याला ही बाब समजली आणि त्याने आपल्या वडिलांना सांगितले होते. तेव्हापासूनच राजेश हा युगचा द्वेष करीत होता. त्याने दोन-तीन वेळा युगच्या कानशीलावर थापडा मारल्या होत्या. युग हा एकदा रडत असताना डॉ. चांडक यांना दिसताच त्यांनी राजेशला जबरदस्त फटकारले होते. ताकीद देऊनही राजेशच्या वर्तनात फरक पडत नसल्याने डॉ. चांडक यांनी त्याला ८ आॅगस्ट २०१४ रोजी कामावरून काढले होते. युगमुळेच आपल्याला नोकरी गमवावी लागली म्हणून राजेशने तब्बल एक आठवडापूर्वीच सूड घेण्याची योजना आखली होती. यासाठी त्याने आपला मित्र अरविंद सिंग याची मदत घेतली.
‘पप्पा जल्दी बुला रहे है’
युग हा शाळेत स्कूलबसने जायचा आणि घरी परतायचा. राजेशने त्याच्या येण्या-जाण्याची माहिती काढली होती. १ सप्टेंबर रोजी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास तो युगच्या घरासमोर थांबला. आपण आजही कामावर आहोत, हे भासवण्यासाठी त्याने क्लिनिकचा लाल रंगाचा टी शर्ट घातलेला होता.
आधी त्याने चौकीदाराला युगच्या येण्याची चौकशी केली होती. चौकीदाराने त्याला युग शाळेतून आला नसल्याचे सांगितले होते. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास युग बसमधून खाली उतरताच राजेशने त्याला गाठले आणि ‘ पप्पाने जल्दी क्लिनिक में बुलाया है’, असे त्याला सांगितल होते. युगने दफ्तर चौकीदाराला देऊन तो राजेशच्या स्कूटीवर बसला होता. थोडे समोर गेल्यानंतर राजेशचा मित्र अरविंद भेटला होता. त्यानंतर अरविंदने स्कूटीचा ताबा घेऊन राजेशला मागे बसवले होते तर युगला मध्ये बसवले होते.
राजेशने खापरखेडाकडे जाण्याची योजना आखली होती. दहिबाजार आणि कळमना हे दोन्ही रस्ते खापरखेडाकडे जातात. दहिबाजारचा रस्ता अतिवर्दळीचा असल्याने अपहरणकर्त्यांनी अर्ध्या रस्त्यातून वळून कळमन्याचा रस्ता गाठला होता. काही तरी गडबड असल्याचे युगच्या लक्षात येताच त्याने राजेशला हटकले होते आणि स्वत:ची सुटका करण्यासाठी धडपडही केली होती.
त्याच वेळी राजशने युगच्या नाकावर रूमाल ठेवून त्याला क्लोरोफॉर्मची सुंगणी दिली होती.
केवळ ती क्रूरताच
या दोन्ही नराधमांनी युगला पाटणसावंगी ते लोणखैरी दरम्यानच्या निर्जन अशा नाल्याच्या पुलाखाली आणले होते. त्यावेळी सायंकाळचे ६ वाजले होते. राजेशने युगला आधी थापडा मारल्या. त्यानंतर एकाने पाय पकडून दुसऱ्याने त्याच्या नरड्याचा घोट घेतला.
वेदनेने युगने पँटमध्येच लघवी केली होती. त्यामुळे दोघांनीही त्याला उचलून खाली आपटले होते. त्यानंतर नाल्याच्या रेताड जमिनीत खड्डा करून त्यात युगचे शीर घातले होते. रेताड मातीने त्यांनी युगचे शरीर झाकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु माती कमी होती. त्यानंतर या सैतानांनी त्याच्या डोक्यावर मोठा चौकोनी दगड ठेवला होता.
या दगडावर दोघेही दोन वेळा नाचले होते. त्यामुळे चिमुकल्या युगचा भयावह अंत झाला होता. या घटनेनंतर दोघेही आपापल्या घरी परतले होते.