शौचालय बांधकामाला प्रोत्साहन देण्यासाठी निर्मलदूत नेमणार
By Admin | Updated: January 14, 2015 00:17 IST2015-01-14T00:17:40+5:302015-01-14T00:17:40+5:30
निर्मलदूतांची निवड करण्याचा निर्णय; प्रती शौचालय १५0 रुपयांप्रमाणे या निर्मलदूतांना मानधन.

शौचालय बांधकामाला प्रोत्साहन देण्यासाठी निर्मलदूत नेमणार
वाशिम : हागणदारीमुक्तीचा संकल्प घेऊन निघालेल्या राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने आता शौचालय बांधकामाला प्रोत्साहन देण्यासाठी निर्मलदूतांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रती शौचालय १५0 रुपयांप्रमाणे या निर्मलदूतांना मानधन देण्यात येणार आहे.
स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना साकार करण्यासाठी स्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान राबविले जात आहे. त्यानुसार निर्मल भारत अभियान आता स्वच्छ भारत मिशन म्हणून नावलौकिकास आले आहे. या अभियानांतर्गत २0१४-१५ या वर्षात राज्यभरात पाच लाख ९६ हजार ४0६ वैयक्तिक शौचालय पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी डिसेंबरअखेर केवळ २५ टक्केच उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. उद्दिष्टपूर्ती करण्याच्या दृष्टिकोनातून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने आता निर्मलदूत नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. शौचालय बांधकामाच्या आराखड्यानुसार प्रत्येक गावात निर्मलदुतांची निवड करण्याचे आदेश ८ जानेवारी रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सर्व जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहेत. मुख्य साधन संस्थांच्या सहकार्यातून निर्मलदुतांची निवड करावी, असेही निर्देश दिले आहेत.