रोजगाराभिमुख शिक्षणावर भर देणार- मुख्यमंत्री

By Admin | Updated: November 26, 2014 01:12 IST2014-11-26T01:12:19+5:302014-11-26T01:12:19+5:30

रोजगाराभिमुख शिक्षणाअभावी राज्यात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे राज्यातील उद्योगांना अनुकूल असे प्रशिक्षित युवक मिळत नाही. हा विरोधाभास दूर करण्यासाठी राज्यात रोजगाराभिमुख

Emphasis will be on employment oriented education- Chief Minister | रोजगाराभिमुख शिक्षणावर भर देणार- मुख्यमंत्री

रोजगाराभिमुख शिक्षणावर भर देणार- मुख्यमंत्री

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृती समारोह
यवतमाळ : रोजगाराभिमुख शिक्षणाअभावी राज्यात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे राज्यातील उद्योगांना अनुकूल असे प्रशिक्षित युवक मिळत नाही. हा विरोधाभास दूर करण्यासाठी राज्यात रोजगाराभिमुख शिक्षणावर अधिक लक्ष देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
स्वातंत्र्य संग्राम सोनानी आणि लोकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्डा ‘बाबूजी’ यांच्या १७ व्या स्मृतिदिनानिमित्त यवतमाळ येथील ‘प्रेरणास्थळ’ या त्यांच्या समाधीस्थळी आयोजित ‘व्हिजन महाराष्ट्र’ या विषयावर आपले विचार व्यक्त करताना फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या १० कोटी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. अशावेळी महाराष्ट्रातील एक कोटी युवकांना एखाद्या विशेष कौशल्याचे प्रशिक्षण देऊन बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
जागतिक दर्जाच्या शिक्षण पद्धतीची गरज
राज्याची विद्यमान शिक्षण पद्धती रोजगाराभिमुख नाही. राज्याच्या शिक्षण पद्धतीत बदल करून तिला व्यावसायिक आणि कला क्षेत्रात जागतिक दर्जाची बनविणे आवश्यक आहे. त्यासाठी अध्ययन केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विदर्भ विकासाचा उल्लेख करताना फडणवीस पुढे म्हणाले, सरकार विदर्भाच्या विकासासाठी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा विचार करीत आहे. शेकडो कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यापेक्षा कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केल्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल आणि त्यासोबतच बेरोजगारांनाही रोजगार उपलब्ध होईल.
कोळशाचा प्रश्न सोडविण्यासाठी मिळाले केंद्राचे सहकार्य
राज्यातील विजेच्या प्रश्नाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, कोळशाअभावी काही गेल्या दिवसांआधी १७०० मेगावॅट क्षमतेचे वीजनिर्मिती केंद्र बंद पडले होते. त्यानंतर केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करून कोळशाचा प्रश्न सोडविण्यात आला. सध्या राज्यातील वीजनिर्मिती प्रकल्पांची कार्यक्षमता ५० टक्के आहे, ज्यात २० टक्के वाढ करून लोडशेडिंगची समस्या सोडविण्यात येईल.
नजीकच्या कोळसा खाणीतून कोळसा घेऊन स्वस्त वीज देणार
महाराष्ट्रातील वीज प्रकल्पांना जवळपासच्या कोळसा खाणींमधून कोळशाचा पुरवठा करून विजेचे दर कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना सौरपंप देण्याचा विचार
विदर्भात चांगला पाऊस पडतो. परंतु सिंचन सुविधांअभावी शेतकऱ्यांना पावसावरच अवलंबून राहावे लागते. सिंचन क्षमता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना आता सौरऊर्जेवर चालणारे पंप देण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. त्यासाठी सौरऊर्जा कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
१९ हजार गावे दुष्काळग्रस्त
या वर्षी राज्यात १९ हजार गावे दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना तत्काळ मदतनिधी देण्याची मागणी आपण केंद्र सरकारकडे केलेली आहे आणि केंद्रानेही साहाय्य देण्याचे आश्वासन दिलेले आहे. शेतकऱ्यांना आता लवकरच मदत दिली जाईल, असे फडणवीस म्हणाले.
ग्रामपंचायतींमध्ये हवामान केंद्र
मुख्यमंत्री पुढे म्हणाले,‘राज्याच्या विविध ग्रामपंचायतींमध्ये हवामान केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
या केंद्रांमुळे शेतकऱ्यांना हवामान आणि पावसाची पूर्वमाहिती मिळेल आणि त्यांची दुबार पेरणीच्या संकटातून मुक्ती होईल; सोबतच ते तंत्रज्ञानाशीही जोडले जातील.
बाबूजींचे स्वातंत्र्य लढ्यातील ९४ वर्षीय सहकारी प्राणजीवन जानी यांनी बाबूजींना आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाला मातोश्री उषादेवी दर्डा, आर्णी-केळापूरचे भाजपाचे आमदार प्रा. राजू तोडसाम, माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, कार्यकारी संचालक करण दर्डा, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, सुनीत कोठारी, बाबूजींसोबत पत्रकारिता करणारे आणि लोकमतचे माजी संपादक मधुकर भावे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता आर्यमन दर्डा याने सादर केलेल्या मांगलिकाने झाली.
या कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य शंकरराव सांगळे यांनी तर आभारप्रदर्शन लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी केले.
विजय दर्डा यांनी मांडल्या विदर्भाच्या समस्या
खासदार विजय दर्डा यांनी विदर्भ तसेच यवतमाळ जिल्ह्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमक्ष मांडल्या.यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग यवतमाळ जिल्ह्यात विकासातील मैलाचा दगड ठरू शकतो. सन २००८ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते याचे भूमिपूजन झाले होते आणि तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. याउपरही मंदगतीने या प्रकल्पाचे काम सुरु आहे. विद्यमान केंद्रीय रेल्वेमंत्री महाराष्ट्राचे आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी विनंती केली तर या रेल्वे मार्गाच्या कार्यास गती मिळू शकते, असे दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. याशिवाय रेल्वेउद्यान, यवतमाळच्या विमानतळाचा विस्तार, यवतमाळचे उद्योग, मिहान, आॅटो हब आणि शेतकऱ्यांच्या समस्याही त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
विकासाची प्रेरणा घेऊन चाललो
बाबूजी तसेच माझे वडील गंगाधर फडणवीस यांच्यात घनिष्ट मैत्री होती. त्यांच्यात अनेकदा विकासाच्या चर्चा रंगायच्या. वडिलांच्या मृत्यूनंतर बाबूजींनी मला अपार प्रेम दिले. मी ‘लोकमत’मध्ये जायचो, तेव्हा ते मला बोलवून घेत आणि अनेक विषयांवर चर्चा करीत. त्यांच्याकडून पित्याप्रमाणे प्रेमाचा वर्षाव होई. बाबूजींसोबत माझेही भावबंध जुळले. ‘प्रेरणास्थळ’ या बाबूजींच्या समाधीस्थळावरून मी तळागाळापर्यंत विकास पोहोचविण्याची प्रेरणा घेऊन जात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विदर्भाला न्याय देण्याची संधी
विकासाचे लक्ष्य समोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी कधीही कोणता भेदभाव केलेला नाही. त्यांच्या पित्याकडून त्यांनी ही शिकवण आत्मसात केली आहे. यासाठी पत्नी अमृता यांनीही त्यांना शक्ती दिली आहे. विदर्भावर कायम अन्याय होत आला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या रूपात युवा नेतृत्व लाभल्याने विदर्भाला एक संधी मिळाली आहे. देवेंद्र यांच्या नावातच शक्ती आहे. याचमुळे युवांची संपूर्ण भिस्त मुख्यमंत्र्यांवर आहे, असे विजय दर्डा म्हणाले.

Web Title: Emphasis will be on employment oriented education- Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.