केंद्राच्या धर्तीवर राज्यात आपतकालीन बचाव दल
By Admin | Updated: July 31, 2014 14:19 IST2014-07-31T13:50:21+5:302014-07-31T14:19:02+5:30
माळीण येथील भीषण दुर्घटनेनंतर राज्य सरकारने केंद्रातील एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यातही राज्य आपतकालीन बचाव दलाची (एसडीआरएफ) स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्राच्या धर्तीवर राज्यात आपतकालीन बचाव दल
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ३१ - माळीण येथील भीषण दुर्घटनेनंतर राज्य सरकारने केंद्रातील एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यातही राज्य आपतकालीन बचाव दलाची (एसडीआरएफ) स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या पथकात सुमारे ४०० ते ५०० जवानांचा समावेश केला जाणार असून राज्यात माळीणसारखी दुर्घटना घडल्यावर एसडीआरएफचे पथक तात्काळ मदतीसाठी रवाना होऊ शकणार आहे.
पुणे जिल्ह्यातील माळीण गावात बुधवारी सकाळी डोंगराचा कडा कोसळला व संपूर्ण गावच नकाशावरुन नष्ट झाले. या दुर्घटनेला आता २४ तासांचा कालावधी लोटला असला तरी अद्याप बचावकार्य सुरु आहे. पाऊस आणि मातीचा ढिगा-यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. मृतांचा आकडा ३० पर्यंत पोहोचला असून आणखी १५० जण ढिगा-याखाली अडकले असावे अशी शक्यता आहे. राष्ट्रीय आपतकालीन बचाव दलाचे (एनडीआरएफ) ३०० या मदतकार्यात अथक मेहनत घेत आहेत. यापार्श्वभूमीवर गुरुवारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने केंद्राच्या धर्तीवर राज्य आपतकालीन बचाव दलाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. एसडीआरएफमध्ये ४०० ते ५०० जवानांचा समावेश केला जाईल. या जवानांना बचावकार्यातील उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल असे सांगितले जाते. मात्र एसडीआरएफच्या प्रशिक्षण केंद्रासाठी जागा, जवानांची भरती कशी केली जाईल, त्यासाठीचा निधी किती लागणार हे अद्याप समजू शकलेले नाही.
एसडीआरएफची स्थापना झाल्यास एनडीआरएफचे जवान येईपर्यंत वाट न बघता तातडीने मदतकार्याला सुरुवात करणे शक्य होईल.
माळीण गावाकडे मदतीचा ओघ सुरू
केंद्रीय गृहमंत्रीी राजनाथ सिंह यांनी आज माळीण गावाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत, दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारतर्फे २ लाख रुपयांची मदत जाहीर केली.
दरम्यान सिद्धिविनायक मंदिरातर्फेही माळीण गावच्या पुनर्वसनासाठी ५० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.