अकरावीचे प्रवेश १00 टक्के आॅनलाइन
By Admin | Updated: January 8, 2017 00:31 IST2017-01-08T00:31:03+5:302017-01-08T00:31:03+5:30
मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि अमरावती या सहा महापालिकांच्या क्षेत्रातील अकरावीतीचे प्रवेश २०१७-१८ च्या शैक्षणिक वर्षात आॅनलाइनच करण्यात येतील

अकरावीचे प्रवेश १00 टक्के आॅनलाइन
मुंबई : मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि अमरावती या सहा महापालिकांच्या क्षेत्रातील अकरावीतीचे प्रवेश २०१७-१८ च्या शैक्षणिक वर्षात आॅनलाइनच करण्यात येतील, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने शनिवारी घेतला. या सहा महापालिकांखेरीज अन्यत्र आतापर्यंतच्या पद्धतीने प्रवेश होतील. जूनच्या पहिल्या आठवड्यात ही प्रक्रिया सुरू केली जाईल. प्रत्येक आठवड्याला एक याप्रमाणे चार नियमित फेऱ्यांद्वारे १५ जुलैपर्यंत प्रवेश दिला जाईल. १५ जुलै ते १ सप्टेंबरदरम्यान दोन आठवड्याला एक या प्रमाणे तीन अतिरिक्त फेऱ्यांद्वारे प्रवेश दिला जाईल.
पहिल्या चार नियमित फेऱ्या झाल्यानंतर अकरावीचे वर्ग सुरू करण्यात येतील. पहिल्या फेरीनंतर विद्यार्थ्यास प्रत्येक फेरीला उपलब्ध असलेल्या रिक्त जागांनुसार प्रत्येक फेरीपूर्वी निश्चित केलेल्या विहित कालावधीत पसंतीक्रम बदलण्याची मुभा असेल. या कालावधीत त्याने पसंतीक्रम न बदलल्यास त्या विद्यार्थ्याचे मागील फेरीचे पसंतीक्रम कायम राहतील. पहिला पसंतीक्रम दिलेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यास प्रवेश मिळाल्यास तिथे पूर्ण फी भरून प्रवेश घेणे बंधनकारक असेल. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील फेरीसाठी विचारात घेण्यात येणार नाहीत. पहिल्या पसंतीक्रमाव्यतिरिक्त अन्य पसंती क्रमांकांचे उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय मिळाल्यास व ते विद्यार्थ्यास मान्य असल्यास असे विद्यार्थी निर्धारित कालावधीत सदर महाविद्यालयात पूर्ण फी भरून प्रवेश निश्चित करतील.
प्रथम फेरीनंतर पसंतीक्रम बदलताना किमान १ ते कमाल १० पसंतीक्रमाची अट ठेवण्यात येणार नाही. एखाद्या विद्यार्थ्याने एकच पसंतीक्रम दिला तरी त्याचा पुढील फेरीमध्ये विचार करण्यात येईल. व्होकेशनल अभ्यासक्रमाचे प्रवेश आॅनलाइनच होतील. अकरावीमध्ये झालेले प्रवेश काही कारणांनी रद्द झाले तर त्यांची माहिती वेबसाईटवर टाकणे बंधनकारक असेल. प्रवेशाची नियमित व अतिरिक्त फेरी संपल्यानंतर म्हणजे १ सप्टेंबरनंतर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर आॅनलाइन पद्धतीनेच प्रवेशाची मुभा विद्यार्थ्यांना असेल. तसेच ही मुभा विद्यार्थी इयत्ता बारावीच्या परीक्षेस बसेपर्यंत उपलब्ध राहील. (विशेष प्रतिनिधी)
- नॅशनल अॅक्रिडीटेशन कौन्सिलच्या (नॅक) धर्तीवर आता राज्यामधील शाळांचे मानांकन करण्यात येणार असून ए ग्रेड मिळालेल्या शाळांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शाळांना केंद्र सरकारच्या शाळा समृद्धी योजनेंतर्गतच्या पोर्टलवर जाऊन शाळेच्या सर्वंकष प्रगतीबाबतची माहिती भरावी लागेल.