वीज पडून दोन तरुणांचा मृत्यू
By Admin | Updated: May 7, 2017 20:18 IST2017-05-07T20:18:32+5:302017-05-07T20:18:32+5:30
खेडगाव आणि पिंप्री शिवारात रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वीज अंगावर पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

वीज पडून दोन तरुणांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
चाळीसगाव, दि. 7 - तालुक्यातील खेडगाव आणि पिंप्री शिवारात रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वीज अंगावर पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. पिंप्री शिवारातील शेतकरी विनोद नाना पाटील यांच्या शेतात किरण सतीश भिल (वय २१ रा.पिलखोड) हा लाकूड तोडत असताना अंगावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत खेडगाव येथील पितांबर हिरामण सूर्यवंशी (वय १८) हा विहिरीचे काम करताना वीज पडून त्याचा मृत्यू झाला. आमदार उन्मेष पाटील यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली व दोघाही मृत झालेल्या कुटुंबाला नैसर्गिक आपत्ती निधीतून प्रत्येकी ४ लाख रु. मिळवून देण्यासाठी त्वरित प्रयत्न करू रक्कम मिळवून देऊ असे त्यांनी सांगितले.
चाळीसगाव शहरात सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तुरळक पाऊस झाला.दुपारपासून ढगाळ वातावरण झाले होते. सायंकाळीही ते कायम होते. मेहुणबारे परिसरात रविवारी दुपारी ४ वाजता ५-१० मिनिटे पाऊस झाला. मका, कांदा, बाजरी उघड्यावर असल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. भडगाव तालुक्यात बांबरुड प्र ब, कजगाव, वाडे परिसरात दुपारी साडेचार वाजता वादळासह पाऊस झाला. बांबरुड प्र ब येथे गारपीट झाली. पाचोरा शहरातही जोरदार वाऱ्यासह मेघगर्जना झाल्या. त्यामुळे वीजपुरवठाही खंडीत झाला होता.