ओल्या कोळशामुळे वीज निर्मिती अडचणीत
By Admin | Updated: September 2, 2014 01:08 IST2014-09-02T01:08:34+5:302014-09-02T01:08:34+5:30
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला गेल्या अनेक वर्षांपासून लागलेली घरघर अद्याप कायम आहे. पावसाळा सुरू होताच कोळसा खाणीतून ओला व चिकट कोळशाचा पुरवठा होत असल्याने वीज केंद्रातील वीज

ओल्या कोळशामुळे वीज निर्मिती अडचणीत
विजेची समस्या तीव्र : २३४० पैकी १३०८ मेगावॅट विजेची निर्मिती
रवी जवळे - चंद्रपूर
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला गेल्या अनेक वर्षांपासून लागलेली घरघर अद्याप कायम आहे. पावसाळा सुरू होताच कोळसा खाणीतून ओला व चिकट कोळशाचा पुरवठा होत असल्याने वीज केंद्रातील वीज निर्मिती प्रभावित होत असते. ती यंदाही झाली आहे. एकाही संचातून त्याच्या क्षमतेएवढी वीज निर्मिती होत नसून २३४० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या या महाऔष्णिक वीज केंद्रातून केवळ १३०८ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. परिणामी राज्यातील विजेची समस्या आणखी गडद झाली आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा वीज निर्मिती करणारा प्रकल्प आहे. मात्र या केंद्रातून वर्षभरात बोटावर मोजण्याइतक्या दिवसातच क्षमतेएवढी वीज निर्मिती होत असल्याचा अनुभव अनेकवेळा आला आहे. इतर दिवसात नेहमी वीजनिर्मितीत तुटच होत असते. कधी कन्व्हेअर बेल्ट तुटून एखादा संच बंद असतो तर कधी संच देखभाल दुरुस्तीसाठी मुद्दाम बंद केलेला असतो. अनेकवेळा तर या केंद्राला जिल्ह्यात कोळसा खाणी असतानाही मुबलक कोळसा मिळत नाही. याचाही परिणाम वीज निर्मितीवर होत आहे.
घुग्घुस, पदमापूर, दुर्गापूर आदी कोळसा खाणीतून सध्या या केंद्राला ओला व चिकट कोळशाचा पुरवठा केला जात आहे. परिणामी त्याची ज्वलन क्षमता कमी होत आणि त्याचा परिणाम वीज निर्मितीवर होतो. याबाबत वीज केंद्र प्रशासनाने अनेकदा कोळसा खाणीला अवगत केले. मात्र पावसाळ्यामुळे त्यांचाही नाईलाज होत असल्याचे दिसून येते.
याशिवाय वीज केंद्र व्यवस्थापनाकडून ज्या ठिकाणी कोळशाची साठवणूक केली जाते, तिथेही टिनेचे छत नाही. केवळ ताडपत्री झाकून कोळसा ठेवला जातो. कोळसा घेताना ताडपत्री काढली जाते. यावेळी पावसामुळे साठवलेला कोळसाही ओला होतो.
या प्रकारामुळे २३४० मेगावॅट क्षमता असलेल्या या केंद्रातून केवळ १३०८ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे.