कल्याण-डोंबिवलीची निवडणूक १ नोव्हेंबरला
By Admin | Updated: September 29, 2015 03:25 IST2015-09-29T03:25:40+5:302015-09-29T03:25:40+5:30
कल्याण-डोंबिवली व कोल्हापूर महानगरपालिकेसह ३ नवनिर्मित नगर परिषदा व ६४ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे

कल्याण-डोंबिवलीची निवडणूक १ नोव्हेंबरला
मुंबई : कल्याण-डोंबिवली व कोल्हापूर महानगरपालिकेसह ३ नवनिर्मित नगर परिषदा व ६४ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे; तर दुसऱ्याच दिवशी २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी घेऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. याखेरीज गडचिरोली जिल्ह्यातील ४ नगरपंचायतींसाठी ६ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे; तर २ हजार ३५२ ग्रामपंचायतींकरिता तीन टप्प्यांत मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या १२२ जागांकरिता निवडणूक होत असून, त्यापैकी ६१ जागा महिलांकरिता राखीव आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या ८१ जागांकरिता निवडणूक होत असून, त्यापैकी ४१ जागा महिलांकरिता राखीव आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत अगोदर समाविष्ट केलेली व नंतर वगळण्याबाबत प्राथमिक सूचना काढलेल्या २७ गावांमधील जागांकरिता मतदान
होईल. त्यानंतर सरकारने या गावांकरिता नगरपालिका स्थापन करण्याचा अंतिम निर्णय घेतला तर नगरपालिकेची निवडणूक घेतली जाईल, असेही सहारिया यांनी सांगितले.
सरकारने गावे वगळण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आयोगाला विश्वासात घेतले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिका व नगरपालिकेच्या निवडणुकीकरिता १ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या कालावधीत मतदान होणार असून आरक्षित जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जातीचे प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. परंतु जातप्रमाणपत्र नसल्यास जातपडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा सादर करावा लागेल. अशा उमेदवारांना निवडून आल्याचे घोषित झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केली जाईल. या निवडणुकीकरिता मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू झाली. या निवडणुकीत उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवर उमेदवारी अर्ज भरायचे असून त्याची प्रत काढून ती निवडणूक अधिकाऱ्याला सादर करायची आहे. (विशेष प्रतिनिधी)
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशनपत्र देणे व स्वीकारणे- १ ते ८ आॅक्टोबर २०१५
नामनिर्देशनपत्रांची छाननी: ९ आॅक्टोबर २०१५
नामनिर्देशनपत्र मागे घेणे: १९ आॅक्टोबर २०१५
मतदान केंद्र व मतदार यादीची प्रसिद्धी: २६ आॅक्टोबर २०१५
मतदानाचा दिनांक: १ नोव्हेंबर २०१५
मतमोजणी: २ नोव्हेंबर २०१५
...............................................................
१ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा व नगरपंचायती
ठाणे- मुरबाड, शहापूर, रत्नागिरी- मंडणगड, सिंधुदुर्ग- दोडामार्ग, वाभावे-वैभववाडी, पुणे- चाकण नगरपरिषद, धुळे- साक्री, अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, नाशिक- निफाड, पेठ, चांदवड नगरपरिषद, देवळा, कळवण, सुरगणा, औरंगाबाद- सोयगाव, लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरुर-अनंतपाळ, परभणी- पालम, बीड- शिरुर, वडवणी, पाटोदा, आष्टी, जालना- बदनापूर, घनसांगवी, जाफ्राबाद, मंठा, बुलढाणा- संग्रामपूर, मोताळा, यवतमाळ- महागाव, कळंब, झरी, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, अमरावती- भातकुली, धारणी, नांदगाव-खांडेश्वर, तिवसा, गोंदिया- सालेकरा, सडकअर्जुनी, अर्जुनी, गोरेगाव, देवरी, भंडारा- मोहाडी, साकोला, लाखणी, लाखांदूर, वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर, नागपूर- हिंगणा, कुही, भिवापूर, चंद्रपूर- चिमूर नगरपरिषद, पोंभूर्णा, सावली, गडचिरोली- मुलचेरा, भामरागड, सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, चामोर्शी.
(सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या प्रत्येकी १७ जागांकरिता निवडणूक. चाकण नगरपरिषदेच्या एकूण २३ जागांकरिता निवडणूक. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, धानोरा, कुरखेडा व आरमोली या चार नगरपंचायतींसाठी ६ नोव्हेंबर रोजी मतदान व ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी. याखेरीज १२ नगरपरिषदांच्या १७ जागांच्या रिक्त पदासाठी १ नोव्हेंबर रोजीच पोटनिवडणूक)
.................................................................
ग्रामपंचायत निवडणूक
पहिला टप्पा- रायगड (४८), रत्नागिरी (१०), पुणे (४७), नंदुरबार (२३), अहमदनगर (११), बीड (२३), अकोला (१५) व चंद्रपूर (१२)या ८ जिल्ह्यातील एकूण १८९ ग्रामपंचायतींकरिता २८ आॅक्टोबर २०१५ रोजी मतदान व २९ आॅक्टोबर रोजी मतमोजणी.
दुसरा टप्पा- ठाणे (११३), नाशिक (४४), जळगाव (४), सातारा (१७१), सोलापूर (५२८), सांगली (५४), कोल्हापूर (६), औरंगाबाद (२३), नांदेड (६११), परभणी (३८), उस्मानाबाद (७), जालना (४८२), लातूर (६), हिंगोली (३०), अमरावती (५), यवतमाळ (३), बुलढाणा (६), वाशिम (२), वर्धा (५), गोंदिया (१) व गडचिरोली (सिरोंचा, अहेरी, भामरागड, ऐटापल्ली, मुलचेरा, चामोर्शी तालुक्यातील १५) अशा एकूण २ हजार १५४ ग्रामपंचायतींकरिता १ नोव्हेंबर २०१५ रोजी मतदान व ३ नोव्हेंबर २०१५ रोजी मतमोजणी.
तिसरा टप्पा- गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा, कुरखेडा व कोरची तालुक्यातील एकूण ९ ग्रामपंचायतींकरिता ६ नोव्हेंबर रोजी मतदान व ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी.