नुसत्या हवेवर निवडणुका जिंकता येत नाही - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: August 26, 2014 09:40 IST2014-08-26T09:40:31+5:302014-08-26T09:40:31+5:30
बिहार आणि अन्य राज्यांमध्ये पार पडलेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला पराभवाची चव चाखावी लागली असतानाच शिवसेनेनीही या पराभवरुन भाजपला चिमटा काढला आहे.

नुसत्या हवेवर निवडणुका जिंकता येत नाही - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - बिहार आणि अन्य राज्यांमध्ये पार पडलेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला पराभवाची चव चाखावी लागली असतानाच शिवसेनेनीही या पराभवरुन भाजपला चिमटा काढला आहे. नुसत्या हवेवर निवडणुका जिंकता येत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची 'हवा' आणि 'गणिते' वेगळी असतात हा धडा या पोटनिवडणुकीतून मिळाला आहे असे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मंगळवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी देशभरात पार पडलेल्या पोटनिवडणुकीचे विश्लेषण केले आहे. 'लोकसभेत मोदी लाट होती व या लाटेले उत्तर भारतातील मोदीविरोधकांना भूईसपाट केले पण पोटनिवडणुकीतील निकालाने या विरोधकांना जीवनदान मिळाले असे उद्धव ठाकरे म्हणतात. मोदी लाटेत गंटांगळ्या खाणारे बिहारमधील कट्टर विरोधक लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार एकत्र आले. या दोघांना मिळालेल्या विजयाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही असे मतही ठाकरे यांनी मांडले. या पोटनिवडणुकांमधून लोकसभा व विधानसभेचे मतदान वेगळे असते हे मतदारांनी दाखवून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नुसत्या हवेवर निवडणुका जिंकता येत नाही. लोकांनी मोदींना राष्ट्राचा कारभार चोख करण्यासाठी मतदान केले. आता महाराष्ट्रात सत्ताबदल करण्यासाठी शिवसेना - भाजप महायुतीले मेहनत करावी लागेल असे सांगत उद्धव ठाकरेंनी स्वबळाची भाषा करणा-या भाजपला महायुतीचे महत्त्व दाखवून देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असावा असे जाहीर वक्तव्य करत आहे. लोकसभेतील विजयामुळे भाजप नेत्यांमध्ये उत्साह संचारला असून विधानसभेत महाराष्ट्रात भाजपने स्वबळावर लढावे अशी मागणीही भाजपच्या नेत्यांनी केली आहे. मात्र बिहार, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि पंजाब या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षीत यश मिळू शकलेले नाही. त्यामुळे मोदी लाट ओसरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेनेही हीच संधी साधून स्बळावर लढण्याची भाषा करणा-या भाजपला त्यांची 'जागा' दाखवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे.