शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बंड नव्हे, शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा; शिंदे गटाने पत्रक काढत मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 14:55 IST

हे सत्तेचे राजकारण असते तर तेही एकवेळ समजून घेतले गेले असते. पण, सत्ता कशाच्या बळावर तर स्वत:ला संपवून? हे आम्हाला कदापिही मान्य नाही.

गुवाहाटी - मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं चित्र निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ३८ आमदार आहेत. त्यामुळे या आमदारांविरोधात शिवसैनिकांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे. बंडखोरांनी पाठित खंजीर खुपसला अशी भाषा शिवसेना नेत्यांकडून वापरली जात आहे. तर काहीजण थेट धमकावत असल्याचं समोर आले. 

शिंदे गटाच्या बाजूने असलेले आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट शब्दात पत्रक काढत शिंदे गटाच्या आमदारांची भूमिका मांडली आहे. या पत्रकात म्हटलंय की, गेल्या ५ दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. आम्ही वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचे शिवसैनिक काही काळासाठी बाहेर काय पडलो तर घाण ठरलो. डुकरं ठरलो. आमच्याच भरवशावर राज्यसभेत बसणारे रोज विखारी भाषा करतात. आता तर आमच्या मृतदेहाची त्यांना आस लागली आहे. कळीचा मुद्दा हाच आहे की, गुवाहाटीत बसून आमचा, शिवसेनेचा आवाज बुलंद करण्याचे तेच खरे कारण आहे. तीच या सन्मानाच्या लढाईची पार्श्वभूमी आहे. हे बंड नाही तर शिवसेनेच्या आत्मसन्मानाची लढाई आहे. अर्थात आजच्या नेतृत्वाला हे समजूनही उमजत नाही. हेही आमचे मोठे दु:ख आहेच. आज आम्हाला विकले गेलेले ठरविणारे कोण, केव्हा आणि कसे आणि कुणाले विकले हे थोडक्यात सांगण्याचा हा प्रयत्न 

वाचा पत्र जसच्या तसं...

आज जी परिस्थिती त्याची पाळेमुळे जुनी आहेत. शिवसेना आणि भाजपाची युती अतिशय जुनी, २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक आम्ही एकत्रित लढलो. शिवसेनेची ताकद होतीच पण नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि उद्धव ठाकरे यांचे परिश्रम यामुळे शिवसेनेचे १८ खासदार विजयी झाले. विधानसभा निवडणूक सुद्धा आम्ही एकत्रित लढवण्याचे ठरवले. त्यावेळी युवानेते आदित्यजी यांनी मिशन १५१ राबवले. अशात भाजपाने १४० जागांचा प्रस्ताव दिला होता. पण वाटाघाटीअंती भाजपाने १२७ जागा घ्यायाच्या आणि शिवसेनेला १४७ जागा द्यायच्या यावर शिक्कामोर्तब झाले. शिवसेनेची ताकद होतीच पण ४ जागांचा आग्रह काही सोडण्यात आला नाही. शेवटी जे व्हायला नको तेच झाले. दीर्घकाळाची युती तुटली आणि आम्हाला वेगवेगळ्या निवडणुका लढाव्या लागल्या. येथे एक बाब आवर्जुन नमूद केली पाहिजे की, २०१४ ची निवडणूक असो की २०१९ नंतर राज्यात उद्बवलेली परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत की, भाजपाचे केंद्रीय अथवा राज्यस्तरावरील नेते अगदी कुणीही आमचे आदर्श वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही. 

पुढे काही दिवसातच शिवसेना आणि भाजपा पुन्हा सोबत आली. केंद्रात आमचेही मंत्री झाले. पण हाच तो कालखंड होता. जेव्हापासून संजय राऊत यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका करण्याचा विषारी क्रम प्रारंभ केला. म्हणजे केंद्रात मंत्रिपदे घ्यायची, मोदींच्या मंत्रिमंडळात राहायचे, राज्यातील सरकारमधील घटकपक्षही राहायचे आणि मोदींवर जहरी टीका करायची यातून दोन पक्षांतील दरी वाढवण्याचे काम प्रारंभ करण्यात आले. याही काळात आम्ही सर्व आमदार वेळोवेळी या बाबी पक्षनेतृत्वाच्या लक्षात आणून देण्याचे काम करतच होतो. पण त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. दररोज अतिशय अश्लाघ्य शब्दात टीका होतच राहायची. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि देशातील अन्य विरोधी पक्ष सुद्धा जी भाषा वापरत नाही ती भाषा आमच्या संजय राऊतांच्या तोंडी कायम असते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वातून भाजपा वाढत होतीच पण शिवसेना सुद्धा आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने करत होती. या वाटचालीत हिंदुत्वाचा विचार आणखी भक्कम होत होता. याचा आम्हाला अधिक आनंद होता. शेवटी युती, आघाड्या यापेक्षाही आपला आक्रमक हिंदुत्व बाणा, ही बाळासाहेबांची आम्हाला पहिली आणि अंतिम शिकवण आहे आणि यापुढेही तीच आजन्म राहील. आमचा जन्म असो की मृत्यू हिंदुत्वाची चादर पांघरूनच होईल. 

हळूहळू शिवसेनेच्या राजकारणाने नवीन आयाम प्राप्त करणे प्रारंभ केले होते. राजकारणाची दिशा बदलत होती. हे राजकारण शिवसेनेच्या वाढीसाठी, हिंदूत्त्वाच्या विचारवाढीसाठी असते, तर ते समजूनही घेता आले असते. हे सत्तेचे राजकारण असते तर तेही एकवेळ समजून घेतले गेले असते. पण, सत्ता कशाच्या बळावर तर स्वत:ला संपवून? हे आम्हाला कदापिही मान्य नाही. शिवसेनेचे अस्तित्त्वच राहणार नसेल तर मिळणारी पदं, सत्ता काय कामाची? हळूहळू हेच लोण जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत पातळीवर जाऊन पोहोचले. ज्यांच्यासोबत भांडण्यात आमची हयात गेली, किंबहूना शिवसेनेचा पायाच ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात उभा राहिला, वाढला, तो पायाच उध्वस्त करण्याचा उपक्रम राबविण्याच्या प्रयत्नांना गती दिली जात होती. थोडक्यात काय तर सत्तेतही आम्हीच होतो आणि विरोधी पक्षातही आम्हीच!

एव्हाना या राजकारणाचा मुख्य बिंदू लक्षात यायला लागला होता. २०१९ जसजसे जवळ येत गेले, तसा हा विखार आणखी वाढत गेला. लोकसभा निवडणूक आधी होती. तेव्हाही जागावाटपात भाजपाने १ जागा (पालघर) उमेदवारासह शिवसेनेला अधिकची दिली. याच काळात युतीची घोषणा झाली, तेव्हा ती लोकसभा आणि विधानसभा अशी संयुक्तपणे जाहीर केली गेली. विधानसभा निवडणूक झाली आणि आमच्या युतीला बहुमत मिळाले. सरकारचे गठन ही औपचारिकता मात्र शिल्लक राहिली असताना अचानक हेच संजय राऊत पुन्हा सक्रिय झाले. त्यांच्या या सक्रियतेला शरद पवार साहेबांचे आशिर्वाद होतेच. जनतेने जनादेश शिवसेना-भाजपा युतीला दिला होता. पण, ज्यांना आपण मराठी माणूस म्हणतो, त्याच मराठी माणसाचा. त्याही वेळी आम्ही वारंवार सांगत होतो की, आपण भाजपासोबत राहिले पाहिजे. ज्यांनी हिंदूत्त्वाचा सातत्याने अपमान केला, ज्यांच्याविरोधात हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आजन्म लढले, ज्यांनी शिवसेना फोडली आणि नेते आपल्या पक्षात घेतले, ज्यांनी शिवसेनाप्रमुखांना जेलमध्ये टाकण्याचा जप्रयत्न केला, ज्यांनी आमच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा घोर अपमान एकदा नाही तर सातत्याने केला आणि अगदी हे महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यावर सुद्धा सावरकरांचा अपमान जे सातत्याने करीत राहीले, अशांसोबत बसणे आम्हाला तेव्हाही मान्य नव्हते. पण, पक्षप्रमुख जे सांगतील ते आम्ही निमूटपणे करीत राहिलो.

आज पाणी डोक्यावरून बरेच पुढे निघून गेले आहे. आज आमच्याच जीवावर राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्ष सत्ता उपभोगत असताना आम्हाला मुळासकट संपविणार असतील, आमचे मतदारसंघ आमच्या हातून घालविणार असतील, तर ते आम्हाला मान्य नाही. सत्ता येईल किंवा सत्ता जाईल. पण, हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज-विचार अजरामर आहे आणि अजरामर राहील. तो विचार अजरामर ठेवण्यासाठीच आमचा लढा आहे. हा लढा सत्तेसाठी नाही, सत्तेत तर आम्ही होतोच. पण, संजय राऊतांच्या सल्ल्याने अख्खा पक्ष जर शरद पवारांच्या दावणीला बांधायचा असेल तर मग शिवसेनेचे अस्तित्त्व काय उरेल?

ज्या काश्मीरच्या प्रश्नावर वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतली, नव्हे काश्मिरी पंडितांना महाराष्ट्रात निमंत्रण दिले, त्या कलम ३७० च्यावेळी उघडपणे आमच्या नेत्यांना बोलता येऊ नये, इतकी वाईट अवस्था? सोनिया गांधी आणि शरद पवारांना खुश करण्याच्या नादात आम्ही आमचा आत्मसन्मान घालवायचा का? सर्व महत्त्वाची खाती काँग्रेस, राष्ट्रवादीला देऊन टाकायची आणि मुख्यमंत्रीपद तेवढे ठेवायचे. दाऊदशी संबंध असल्याचा आरोप झालेल्या मंत्र्याचा बचाव करायचा तरी कसा? राज्यसभा निवडणुकीतही या पक्षांनी शिवसेनेच्याच उमेदवाराला हरवायचे. मग करायचे तरी काय? नुसतं सहन करीत बसायचे? दुर्दैव म्हणजे जे कधीही जनतेतून निवडून आले नाहीत, ते संजय राऊत पक्ष संपवायला निघाले आहेत. संजय राऊत हेच शरद पवारांच्या गळ्यातील ताईत आहेत. भाजपापासून तुम्ही शिवसेना कदाचित दूर नेऊ शकाल. पण, शिवसेना जर हिंदूत्त्वापासून दूर नेणार असाल तर ते आम्ही कसे खपवून घ्यायचे? आणखी दुर्दैव म्हणजे याच संजय राऊतांचे ऐकून पक्ष चालणार असेल आणि आमच्यासारख्या अनेकवेळा जनतेतून निवडून येणार्‍या आमदारांना दूर ढकलले जाणार असेल तर करायचे तरी काय? उद्धवजी आणि आमच्यात दरी वाढविण्याचे पाप संजय राऊतांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी बंदूक चालवायची, खांदा संजय राऊतांचा वापरायचा आणि त्यातून मारले जाणार कोण तर पक्षाचे शत्रू नव्हे तर आपणच. हे आम्हाला मान्य नाही. म्हणूनच आमचा हा लढा शिवसेनेचा आहे, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा आहे, शिवसेनेच्या अस्तित्त्वाचा आहे, मराठी आणि हिंदूत्त्वाच्या अस्मितेचा आहे. हे बंड नाही, हा शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा आहे आणि तो जिंकल्याशिवाय आता माघार नाही. म्हणूनच महाराष्ट्राच्या सदिच्छांचे, आशिर्वादाचे बळ आम्हाला लाभते आहे. आम्ही शिवसेनेसोबतच आहोत. शिवसेनेचे व आमचे पक्षनेते उद्धव साहेब यांनी आमच्या आग्रहाचा विचार करावा व विद्यमान आघाडी ऐवजी भाजपसोबत युती करावी. महाराष्ट्राच्या जनतेने युती म्हणून निवडून दिलेल्या युतीचे पुनर्जीवन करावे. 

आम्ही संपणार नाही, आम्ही थांबणार नाही, महाराष्ट्राला पुन्हा नव्या उंचीवर नेल्याशिवाय आता आम्ही माघार घेणार नाही!जय महाराष्ट्र! दीपक केसरकर

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा