एकेक महिमा सांगता विस्तार होईल बहु कथा
By Admin | Updated: September 4, 2016 02:15 IST2016-09-04T02:15:23+5:302016-09-04T02:15:23+5:30
पाऊस सुरू झाला की, शाडूच्या मातीत पाणी टाकल्यावर सुगंध दरवळतो. तेथून गणपती उत्सवाला सुरुवात होते, असे गणेशाची मूर्ती साकारणारे अनेक कलावंत मानतात.

एकेक महिमा सांगता विस्तार होईल बहु कथा
- रविप्रकाश कुलकर्णी
पाऊस सुरू झाला की, शाडूच्या मातीत पाणी टाकल्यावर सुगंध दरवळतो. तेथून गणपती उत्सवाला सुरुवात होते, असे गणेशाची मूर्ती साकारणारे अनेक कलावंत मानतात. त्यालाच जोडून माझ्या मनात स्वर निनादू लागतात -
गणांना त्वा गणपति हवामेह
कविं कवीनामुपमश्रवस्तपम्।
ज्येष्ठ राजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत
आ न: शृण्वत्रूूतिभि: सीद सादक्य।।
याचा अर्थ समुदायाचा प्रभू म्हणून तू गणपती. ज्ञानवंत जनामध्ये तू अतिशय ज्ञानी. कीर्तिवंतामध्ये तू वरिष्ठ, तूच राजाधिराज, तुला आम्ही आदरयुक्त भावनेने बोलावितो. तू आपल्या सगळ्या शक्तिनिशी ये आणि या आसनावर स्थित हो।
जगातील उपलब्ध असलेला सर्वात पहिला प्राचीन ग्रंथ ऋग्वेद समजला जातो. (इसवी सनपूर्वी सहा हजार वर्षांपूर्वीचा ग्रंथ) त्यातले ब्रह्मणस्पतिसुक्त हे गणेशालाच आवाहन आहे, जे आजही ताजे वाटते. या आवाहनाची प्रचिती आल्यामुळे आणि येत असल्याने, पार संतमहात्म्यांपासून अगदी आजच्या कवीगणांनीदेखील गणेशस्तुती, गणेशवंदना केलेली दिसते, या पुढेही दिसेल. या सगळ्यात समर्थ रामदास यांच्या -
सुखकर्ता दु:खकता वार्ता विघ्नाची
नुरवी पूरवी प्रेम कृपा जयाची
या आरतीशिवाय गणेशपूजन महाराष्ट्रात तरी झालेय, असे ऐकिवात नाही, इतके हे समीकरण घट्ट आहे. अशा वेळी मनात मात्र समर्थ रामदासांपूर्वीदेखील गणेशपूजन होतच होते, तेव्हा कुठली आरती म्हटली जात असेल, असे मनात येते. आणखी एक विचार मनात येतो, समर्थांची ही आरती सर्व थरापर्यंत कशी काय पोचली असेल? हा शोध मनोरंजक आणि विचार दिशा देणारा ठरू शकतो... याच्या जोडीला नारद पुराणातील संकटनाशक गणेशस्तोत्रम येते -
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्य मायु: कामार्थसिद्धये।।
पण हे संस्कृत स्तोत्र अवघड वाटेल, हे जाणून श्रीधराने त्याचा मराठीत जो अनुवाद केलेला आहे -
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका
भक्तिने स्मरता नित्य, आयु: कामार्थ साधती।।
या परंपरेवर ज्याचे लालनपोषण झाले, त्या ग. दि. माडगुळकरांनी आत्मविश्वासपूर्ण म्हटले आहे -
माझीया रक्तात काही ईश्वराचा अंग आहे।
ज्ञानियाचा वा तुक्याचा हाच माझा वंश आहे!
आता गदिमांनी सहजपणे लिहिले -
तू सुखकर्ता तू दु:खकर्ता
तूच कर्ता आणि करविता
मोरया, मोरया मंगलमूर्ती मोरया।।
याच माडगुळकरांनी गीत रामायणानंतर जे अनेक संकल्प केले होते, त्यात गीत गजाननदेखील होते. त्याचीच सुरुवात म्हणून त्यांनी अथर्वशिष्याचा मराठी प्रथानुवाद केला होता आणि तो गणेशभक्त जयंत साळगावकरांनी प्रकाशित केला होता.
गणेशवंदना करणाऱ्यांची यादी करावी, तेवढी कमीच आहे. त्यात शांता शेळके, जगदीश खेबूडकर, शांताराम नांदगावकर असे सगळे येतील. आता तर ‘गणपती टॉपटेन’ वा ‘गणपती नॉनस्टॉन धमाका’ अशा सीडीजचा ढीगच्या ढीग असेल!
ग. दि. माडगूळकरांवर जशी सरस्वती प्रसन्न तेवढाच भक्तिभाव असणारे त्यांचे चाहतेदेखील होते. त्या भक्तिभावाचे दर्शन पाहा -
एरव्ही गदिमांच्या पायाला चक्र लागलेले असायचे, घरी म्हणून ते सापडायचे नाहीत. मात्र, श्रीगणेश चतुर्थीला मात्र जेथून असतील, तेथून सर्व कामधाम सोडून पुण्यात ‘पंचवटी’मध्ये गणेशपूजनासाठी येणार म्हणजे येणारच. या दिवशी गदिमांना भेटणाऱ्यांसाठी संख्या कमी नव्हती. कारण त्या दिवशी अण्णा पंचवटीत असणारच, हे त्यांना ठाऊक असायचे...
अशा चाहत्यांत एक असायचे द. का. हसबनीस. गदिमांकडची गणेशपूजा आटोपली की, अण्णांना घेऊन तडक निघायचे, ते टिळक रोडवरच्या प्रेस्टिजीयस प्रिन्टेक्स्ट प्रेसवर!
गेल्या-गेल्या आगत स्वागत झाले की, अण्णांच्या पुढ्यात नवे कोरे कागदाचे पॅड दिले जाई.
मग अण्णा त्या पांढऱ्या शुभ्र कागदाकडे एक कटाक्ष टाकत आणि क्षणभर डोळे मिटून पेन काढून त्यावर श्री कार टाकत आणि त्या अंगाला त्यांना जे काही साहित्य द्यायचे त्याची सुरुवात करत. जणू काही ते पाठ करून आलेत, इतक्या सहजतेने ते लिहीत.
निवडक मंडळी उत्सुकतेने ते सर्व भक्तिभावाने पाहत असत. लेखकाला तंद्रीत लिहिताना पाहणे यासारखे दुर्मीळ चित्र नसेल.
अण्णाचे लिहून झाले की, ते मान वर करून पाहत. कम्पोझीटर जणू वाट पाहत उभाच असे. अण्णा त्याच्याकडे कागद सुपूर्द करत. त्या कम्पोझीटरला पण आपण आधुनिक वाल्मिकीचे साहित्य सर्वप्रथम हातात घेत आहोत, याची जाण असायची, नव्हे... अभिमान वाटायचा. हाताने खिळे जुळवून कम्पोझ करण्याचा तो काळ. इकडे सगळे वाट पाहत की, ‘मॅटर’ केव्हा येतेय...
मग एकदाचे विजयी मुद्रेने ते कम्पोझिटर बाहेर यायचे. त्यांच्या हातात मुद्रित असते. सगळ्याच्या नजरेने ते टिपले जाई.
द. का. हसबनीस यांच्या ‘सुदर्शन’ दिवाळी अंकाचा मुहूर्त हा असा गणेश चतुर्थीला होई!
असाच श्रद्धाळू संपादक म्हणजे ‘आवाज’चे मधुकर तथा भाऊ पाटकर, संध्या केल्याखेरीज ते घराच्या बाहेर पडत नसत. अशा भाऊंची दिवाळी अंकाची तयारी केव्हाच सुरू झालेली असायची. पत्रे, विषयाची चर्चा, भेटीगाठी आणि मजकूर देण्याची शेवटची तारीख!
श्रीगणेश चतुर्थीला मात्र गणपती पूजनाला हार फुले नैवद्य याच्याबरोबरच दिवाळी अंकासाठी ज्याचे साहित्य आलेले असेल, ती हस्तलिखिते प्रस्थान ठेवून ते प्रार्थना करत असत.
हे लिहीत असताना मला दि. बा. मोकाशी यांची आठवण तीव्रतेने येते आहे. खरे तर गेल्या वर्षी त्यांची जनशताब्दी साजरी झाली, तेव्हाच ही आठवण सांगायची राहून गेली, पण आता निमित्ताने सांगायला हवीच.
दि. बा. मोकाशी हे मोजकेच लिहिणारे. कथा कुणाकुणाला घ्यायच्या असे, पण ‘माणूस’ साप्ताहिकासाठी ते ‘सदर’ लिहायला लागले. ‘संध्याकाळचे पुणे’ त्याचे हे पहिलेच सदर लेखन. गणपती संबंधात लिहून झाल्यानंतर त्यांनी म्हटले होते -
तेव्हा शेवटी सांगायचे म्हणजे, ‘श्रीगणेशाय नम:’ म्हणून व गणपती बाप्पा मोरयाचा गजर करून मी वाचकांची (दोन महिने) सुट्टी घेत आहे आणि दिवाळी अंकाचे लेखन पुरे करण्याचा प्रयत्न ‘संध्याकाळचे पुणे’ हे सदर दोन महिने बंद ठेवीत आहे क्षमस्व.
आता भेट दिवाळी!
अर्थात, ही गोष्ट झाली दि. बा. मोकाशींची. मी मात्र म्हणेन उद्या येणाऱ्या श्रीगणेश चतुर्थीला तुम्ही संकल्प तरी करा. तशी प्रार्थना करा. तुम्हाला प्रचिती आल्याखेरीज राहणार नाही.
त्यासाठी त्या श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना!