दुष्काळग्रस्त कुटुंबे स्वगृही रवाना

By Admin | Updated: May 30, 2016 04:24 IST2016-05-30T04:24:16+5:302016-05-30T04:24:16+5:30

दीड महिन्यापेक्षा अधिक काळ येथे राहिलेले दुष्काळग्रस्त रविवारी माघारी गेले.

Dwelling families leave their own land | दुष्काळग्रस्त कुटुंबे स्वगृही रवाना

दुष्काळग्रस्त कुटुंबे स्वगृही रवाना


ठाणे : कपडे-भांड्यांची बांधाबांध सुरू झालेली, आदरातिथ्य उत्तम झाल्यानं आणि रोजंदारी करून थोडी पुंजी जमा केल्यानं चेहऱ्यावर समाधान, कृतज्ञतेने सहज जोडले जाणारे हात आणि अखेरीस निरोप घेताना पाणावलेले डोळे... असे चित्र पाहायला मिळाले ते ठाण्यात उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे दुष्काळग्रस्त छावणीत. दीड महिन्यापेक्षा अधिक काळ येथे राहिलेले दुष्काळग्रस्त रविवारी माघारी गेले. ‘गावाकडे थोडासा पाऊस झालाय, आता तो कवाबी येलं. त्यामुळं पावसाळ्याआधीची शेतीची कामं उरकावी लागतील, म्हणूनच निघालो’ असा आशावाद सोबत घेऊन त्यांनी निरोप घेतला.
नांदेड, लातूर जिल्ह्यांच्या विविध खेड्यापाड्यांतून आलेल्या सुमारे ४०० दुष्काळग्रस्तांना ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या छावणीच्या माध्यमातून एक
आसरा आणि विविध कामांच्या माध्यमातून रोजगारही उपलब्ध करून दिला होता. रविवारी ते आपल्या गावी परतले. यावेळी शिंदे यांनी स्वत: उपस्थित राहून दुष्काळग्रस्तांशी संवाद साधला. तुमची येथे सोय करून मी माझे कर्तव्य केले. पण, संकटात असलेल्यांना मदत करणे, हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवले. तुम्ही ठाण्यात परत या, पण दुष्काळग्रस्त म्हणून येण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये. मात्र, कधीही कटू प्रसंग आला तर ठाण्याचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत, असे शिंदे यांनी सांगितले. छावणीतील मुलांसाठी बाळासाहेब ठाकरे शिष्यवृत्ती योजना सुरू करणार असून त्याअंतर्गत मुलांच्या शिक्षणाचा खर्च आपण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
यावेळी शिंदे यांच्या हस्ते कुटुंबांना साडी, भांडी, धान्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. तर, दुष्काळग्रस्तांनीही आपल्या शब्दांत शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, विभागप्रमुख परेश चाळके, तसेच राहुल लोंढे, दत्तात्रेय आरोटे, शिवाजी दिवटे, बाबासाहेब कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
त्यांनीही जपली माणुसकीची जाण
ठाण्यात आपली चांगली सोय ज्यांनी केली, त्या पालकमंत्री शिंदे आणि मोजकेच ६ ते ७ कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यासाठी दुष्काळग्रस्त बांधवांनी स्वत: हून वर्गणी काढली होती. त्या माध्यमातून त्यांनी पुष्पगुच्छ आणि शाल आणण्याचे ठरवले होते. प्रत्येकाने शक्य होईल तसे २० ते १०० रुपये दिले होते. मात्र, कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याला नकार देऊन पैसे परत वाटून घेण्यास सांगितले. परंतु, त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता ही बरेच काही सांगून गेली, असे कार्यकर्ते म्हणाले.
यापूर्वी ठाण्यात कधीच आलो नव्हतो. दुष्काळामुळे ठाणे गाठले. पण, परक्या गावाला आलो, असे कधीच जाणवले नाही. इथे आम्हाला राहण्याबरोबर अन्नधान्य, पाण्याचीही सोय उपलब्ध करून दिली.
- कविता दळवी, हिंगोली
पहिल्यांदाच दुष्काळामुळे घर सोडलं, पण येथे सगळ्यांनीच आमची मुलांप्रमाणे काळजी घेतली. ही सगळी माणसंही आम्हाला कुटुंबातीलच वाटायची. त्यामुळे पुन्हा घराकडे निघालो, याचा आनंद असला तरी ठाण्यातून जातो आहोत, याचे दु:खही आहे.
- अनसूया चव्हाण, मुखेड

Web Title: Dwelling families leave their own land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.