वाढत्या गुन्हेगारीने सामान्यांत धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 01:46 IST2016-10-20T01:46:30+5:302016-10-20T01:46:30+5:30

तळेगाव शहर परिसरासह मावळ तालुक्यातील अलीकडच्या काळातील गुन्हेगारीचा वाढता आलेख हा चिंतनीय बनला

Due to increasing crime, general public | वाढत्या गुन्हेगारीने सामान्यांत धास्ती

वाढत्या गुन्हेगारीने सामान्यांत धास्ती


तळेगाव दाभाडे : तळेगाव शहर परिसरासह मावळ तालुक्यातील अलीकडच्या काळातील गुन्हेगारीचा वाढता आलेख हा चिंतनीय बनला असून, वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य माणूस धास्तावला गेला आहे. माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची पूर्ववैमनस्यातून रविवारी भर दिवसा झालेली निर्घृण हत्या , हत्येची पद्धत यांमुळे सारे शहर हादरले आहे.
सप्टेंबर महिन्यात चेतन दत्तात्रय पिंजण (वय १७) या इंद्रायणी महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा त्याच्याच दोन मित्रांनी किरकोळ कारणावरून कोयत्याने वार करून महाविद्यालय परिसरात भर दिवसा खून केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिसांच्या सतर्कतेमुळे मागील महिन्यात तळेगाव नगर परिषदेचे पक्षप्रतोद व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा कट फसला. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. तालुक्यातील गुन्हेगारी व हिंसक प्रवृत्तीत दिवसेंदिवस होणारी वाढ ही चिंतनीय बाब बनली आहे. तालुक्यात गुन्हेगारीचे जाळेच पसरले आहे. लूटमार, खून, हत्या यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने तालुक्यातील वातावरण दूषित झाले आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. सध्या मावळला निकोप वातावरणाची गरज आहे. युवा पिढी बिघडू लागल्याने समाजाची मोठी हानी होणार आहे.
तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजीक आल्या आहेत. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात ग्रामपंचायतीच्या मतदानाच्या वेळी मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश उर्फ बंटी वाळुंज यांच्यावर गोळ्या घालून त्यांचा खून करण्यात आला.
त्यापाठोपाठ आढेचे सरपंच बाळासाहेब केदारी यांचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये आपटी गेव्हंडे येथील ग्रामपंचायत सदस्य आनंद शिंगारे यांच्यावर खुनी हल्ला झाल्याने त्या वेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
(वार्ताहर)
>मावळात जमीन व्यवहारातून आर्थिक सुबत्ता आलेली आहे. एकत्र कुटुंबपद्धती इतिहासजमा होऊ लागली आहे. जमिनीचे तुकडीकरण वाढले. जमीन तुकड्याला सोन्याचा भाव मिळू लागला आहे. सध्या युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढली आहे.
तालुक्यात विनापरवाना पिस्तूल वापरणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची संख्या वाढू लागली आहे. ही बाबही चिंतनीय आहे. स्वस्तात आणि विनासायास पिस्तूल मिळत असल्याने तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही जण मध्य प्रदेश आणि बिहार यांसारख्या परराज्यांतून पिस्तुलांसह घातक शस्त्रांची आयात करत असल्याची चर्चा आहे.

Web Title: Due to increasing crime, general public