हुंडा घेतल्यामुळे नवरीमुलीने मोडले लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 19:01 IST2017-04-26T18:57:01+5:302017-04-26T19:01:57+5:30
नवरीमुलीने धाडस दाखवत हुंडा घेणाऱ्या नवऱ्याला चांगलाच धडा शिकवला आहे.

हुंडा घेतल्यामुळे नवरीमुलीने मोडले लग्न
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 26 - "हुंडा" हा विषय रूढार्थाने चावून चोथा झालेला विषय असला तरी आज 21व्या शतकातही भारतीय समाजाला पोखरणारी सर्वात ज्वलंत समस्या ठरला आहे. हुंडा घेण्याविरोधात आवाज उठला गेला पाहिजे असे आपण बऱ्याचदा म्हणतो, पण तो आमलात आणत नाही, पण ठाणे जवळीत भिंवडीत नवरीमुलीने धाडस दाखवत हुंडा घेणाऱ्या नवऱ्याला चांगलाच धडा शिकवला आहे.
लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात अशी आपल्याकडे म्हण आहे. लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं एकत्रच येणे नव्हे तर दोन कुटुंब या नात्याने जोडली जातात. हुंडा देण्याघेण्याच्या प्रथेचे अनेक बळी आजवर महाराष्ट्रानं पाहिले आहेत. त्यातलंच ताजं उदाहरण म्हणजे शीतल वायाळ. शीतलसारखीच परिस्थिती भिवंडीमध्ये एका मुलीवर ओढावली होती. साखरपुडा होऊन तिचं लग्न मोडलं, पण न खचता ती या संकटाला सामोरं गेली.
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, 12 मार्चला ललिताचा साखरपुडा झाला. लग्नाची तारीख ठरली 1 मे. मुलगा एचडीएफसी बँकेत नोकरी करणारा शहापूरचा भास्कर वेखंडे. साड्या खरेदी झाली, मानपानाचे कपडे झाले, मुलाचे कपडे झाले, सोने खरेदी झालीङ्घ इतकंच काय लग्नपत्रिका छापून त्या वाटल्यासुद्धा. पण तितक्यात तिच्या आनंदावर विरजण पडलं.
(वडिलांच्या झालेल्या अपमानामुळे मंडपातच नवरी मुलीने मोडले लग्न)
ललिताला कॉफीशॉपमध्ये बोलावून भास्करने हुंड्याची मागणी केली. ललिताच्या घरच्यांनी भास्करच्या घरच्यांना समजावण्याच्या प्रयत्न केला. पण ते मानायला तयार नव्हते. अखेर मोठ्या धीरानं ललिताच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पैसा जमवून, कर्ज काढून लग्नाचा खर्च उचलला. त्यावर हुंडा मागणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे, असं ललिता निक्षून सांगते.
भिवंडीतल्या कळंबोळी गावात ललिताचे वडिल हे शेतीसोबत प्लंबिंगचं काम करतात. तर ललिता ही मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतेय.