दुष्काळावरून लक्ष उडवण्यास वाद!
By Admin | Updated: August 21, 2015 00:43 IST2015-08-21T00:43:48+5:302015-08-21T00:43:48+5:30
महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र, पुरेशा व ठोस शासकीय उपाययोजना होत नसल्यामुळे भाजप-शिवसेनेच्या सरकारविरूद्ध जनतेत प्रचंड आक्रोश आहे
_ns.jpg)
दुष्काळावरून लक्ष उडवण्यास वाद!
मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र, पुरेशा व ठोस शासकीय उपाययोजना होत नसल्यामुळे भाजप-शिवसेनेच्या सरकारविरूद्ध जनतेत प्रचंड आक्रोश आहे. यावरून लक्ष विचलित करण्यासाठी राज्य सरकारने हेतुपुरस्सर महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा वाद चिघळवला, अशी टीका वरिष्ठ काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले, यंदा शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळालेली नाही, अनेक जिल्ह्णांमध्ये पावसाळ्यातच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, लोकांना प्यायला पाणी नाही, जनावरांसाठी चारा नाही. या परिस्थितीचा सामना करण्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार अपयशी ठरल्याने सर्वत्र संतापाची लाट आहे. त्यामुळेच शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा वाद जाणीवपूर्वक पेटता ठेवून लोकांचे लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक लिखाण केल्याचा आक्षेप अनेक साहित्यिक, इतिहासकार व विविध क्षेत्रातील नामवंतांनी घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शासकीय पुरस्काराबाबत असा वाद निर्माण होताच महाराष्ट्र सरकारने संबंधितांशी चर्चा करून तो शमवायला हवा होता. उलटपक्षी सरकारने ताठर भूमिका घेऊन वादात तेल ओतले. या वादाला हेतुपुरस्सर जातीय रंग देण्यात आला. हे सरकार जातीयवादी आहे, असा आरोप राणे यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक विधानांचा त्यांनी यावेळी समाचार घेतला. बाबासाहेब पुरंदरेंमुळे शिवाजी महाराज घराघरात पोहोचल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, पुरंदरेंमुळे शिवाजी महाराज की शिवाजी महाराजांमुळे पुरंदरे, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करायला हवा. मी कोणाला भीत नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात.
फडणवीसांना कोणाची भीती नसती तर त्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा देखील वानखेडेवरच घेतला असता, असा टोलाही राणेंनी लगावला. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध न लागल्याबद्दल राणे यांनी गृहमंत्रीपदही सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. (प्रतिनिधी)