नोटा बंदीमुळे चोरांची पंचाईत
By Admin | Updated: November 13, 2016 21:12 IST2016-11-13T21:12:19+5:302016-11-13T21:12:19+5:30
केंद्र शासनाने हजार व पाचशेच्या नोटा रद्द केल्यानंतर त्याचा परिणाम जसा सर्वसामान्य जनतेवर दिसू लागला आहे.

नोटा बंदीमुळे चोरांची पंचाईत
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 13 - केंद्र शासनाने हजार व पाचशेच्या नोटा रद्द केल्यानंतर त्याचा परिणाम जसा सर्वसामान्य जनतेवर दिसू लागला आहे. तसाच परिणाम चोरट्या भुरट्यांवरही झाला आहे. गेल्या पाच दिवसांत शहरामध्ये घरफोडीची एकही घटना घडली नसून चो-यांचे प्रमाणही कमालिचे खाली आले आहे. घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांमुळे जेरीस आलेल्या पोलिसांना या निर्णयामुळे दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. चोरांनी मांडलेल्या हैदोसामुळे पुरते घायाळ झालेल्या पोलिसांना नेमक्या काय उपाययोजना कराव्यात हेच सुचेनासे झाले होते. शेवटी थेट पंतप्रधानच पोलिसांच्या मदतीला धावून आले आणि चो-यांचे प्रमाण झटकन खाली आले.
चलनातील मोठ्या नोटा बाद ठरवण्यात आल्यानंतर देशामध्ये एकच खळबळ उडाली. प्रत्येक जणाच्या तोंडी फक्त नोटा बदलून घेण्याचा आणि स्वत:कडील मोठ्या नोटांचे नेमके करायचे काय याचीच चर्चा होती. पोलीस दलामधील बड्या अधिका-यांनीही स्वत:ची काळी माया सोन्याच्या स्वरूपात परावर्तित करुन उखळ पांढरे करुन घेतले. मोठ्या आर्थिक व्यवहारांवर आयकर विभागाने लक्ष ठेवायला सुरुवात केली होती. त्यामुळे सर्वांचेच धाबे दणाणले होते. घरफोड्या, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, वाटमारी करणा-या चोरट्या भुरट्यांनाही या निर्णयाचा फटका बसलेला आहे. गेल्या पाच दिवसामध्ये शहरामध्ये एकही मोठी घरफोडी अथवा चोरी झाल्याचे उदाहरण समोर आलेले नाही.
सहसा नागरिक घरामध्ये आपत्कालीन खर्चासाठी काही रक्कम ठेवतात. यासोबतच दागिनेही ठेवलेले असतात. त्यामुळे चोरटे बंद घरे हेरुन दिवसा आणि रात्री घरफोड्या करतात. तसेच रात्री बेरात्री कामावरुन घरी जाणा-यांनाही अडवून लुटण्याच्या घटना घडतात. यासोबतच गेल्या काही दिवसांमध्ये लाखो रुपयांची रोकड असलेल्या बॅगा हिसकावण्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच मोटारींच्या काचा फोडून तसेच दुचाकीची डिकी उचकटून लाखो रुपये लंपास करण्यात आल्याच्या घटनांमुळे पोलीस हैराण झाले होते. चोरांनी मांडलेल्या हैदोसामुळे पुरते घायाळ झालेले पोलीस नेमक्या काय उपाययोजना कराव्यात हेच पोलिसांना सुचेनासे झाले होते. शेवटी थेट पंतप्रधानच पोलिसांच्या मदतीला धावून आले आणि चो-यांचे प्रमाण झपकन खाली आले.
चोरट्यांची पंचाईत झाली ती नेमकी आयकर विभागाने सोनारांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे. एकवेळ चोरट्यांनी पैसे सोडून मौल्यवान वस्तू लंपास केल्या असत्या. परंतु चोरलेल्या या वस्तूही आता सोनाराला कमी भावात विकता येणार नाहीत किंवा सोनारच सध्या त्या वस्तू विकत घेण्याच्या भानगडीत पडणार नाहीत. यासोबतच चोरांना चोरीच्या नोटा चलनात खर्च करणे सोपे असते. मात्र, मोठ्या नोटाच चलनामधून बाद झाल्याने चोरीच्या ढिगभर नोटांचे करायचे काय असा प्रश्न त्यांना बहुधा पडलेला असावा. एकूणच काय तर केंद्र शासनावर होणारी 'हे सरकार गरिबांच्या आणि व्यापा-यांच्या मुळावर उठले आहे, ही टीका कितपत खरी आहे हे पाहण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागेल' परंतु सरकारचा हा निर्णय चोरांच्या मुळावर उठल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.