शैक्षणिक धोरणाचा मसुदा अखेर प्रसिद्ध
By Admin | Updated: June 30, 2016 01:25 IST2016-06-30T01:25:28+5:302016-06-30T01:25:28+5:30
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने (एमएचआरडी) ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१६’ चा मसुदा एमएचआरडीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द्ध केला

शैक्षणिक धोरणाचा मसुदा अखेर प्रसिद्ध
पुणे : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने (एमएचआरडी) ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१६’ चा मसुदा एमएचआरडीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द्ध केला असून येत्या ३१ जुलैपर्यंत त्यावरील सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. बदलत्या काळानुसार देशाच्या शैक्षणिक धोरणात सुधारणा करणे आवश्यक होते. त्यामुळे १९८३ नंतर प्रथमच देशाचे नवे शैक्षणिक धोरण ठरविण्याचे काम हाती घेण्यात आले. सुमारे वर्षभर झालेल्या चर्चेनंतर अखेर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशाचे शैक्षणिक धोरण ठरविण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या मसुद्यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच विद्यार्थी, शिक्षक आदींना सामावून घेतले होते. गाव, तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर शैक्षणिक मसुद्यावर चर्चा घडवून आणली होती. महाराष्ट्रासह देशातील सर्व राज्यांनी आपला अहवाल केंद्राला २०१५ मध्ये सादर केला होता. देशाचा शैक्षणिक धोरणाचा मसुदा डिसेंबर २०१५ मध्ये प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. मात्र, सुब्रमण्यम समितीने अहवाल तयार करण्यासाठी अवधी वाढवून घेतल्यामुळे हा मसुदा जून महिन्यात प्रसिद्ध करण्यात आला. विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमाची माहिती आॅनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. परदेशी विद्यापीठांनी भारतात यावे आणि भारतातील विद्यापीठांनी परदेशात जावे, याचाही विचार करण्यात आला आहे. कौशल्य अभ्यासक्रम व शिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१६’ चा मसुदा ४३ पानांचा संक्षिप्त मसुदा एमएचआरडीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)
समानता आणणार
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यामध्ये विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे. देशाची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच अभ्यासक्रमामध्ये समानता आणण्याचा विचारही केला आहे. त्यातही देशातील विविध बोर्डांचा इंग्रजी, विज्ञान आणि गणित या तीन विषयांचा अभ्यासक्रम सारखाच असावा, अशी भूमिका घेण्यात आली आहे. दहावी-बारावीमध्ये इंग्रजी, विज्ञान आणि गणित या तीन विषयांमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये कमी व जास्त काठिण्य पातळीच्या परीक्षा घेण्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अनेक चांगल्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. सर्व बोर्डांचा इंग्रजी, विज्ञान आणि गणित या विषयांचा अभ्यासक्रम सारखा असावा, हा महत्त्वाचा विचार मसुद्यामध्ये करण्यात आला आहे. मात्र, विविध सीईटी प्रवेश परीक्षांबाबत मसुद्यात एकही शब्द नाही. ‘नीट’ परीक्षेच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर याबाबत मसुद्यामध्ये विचार होणे अपेक्षित होते.
- दुर्गेश मंगेशकर, शिक्षणतज्ज्ञ