अलिबाग - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अलिबागमधील चरी गावात डॉ. आंबेडकर यांचे भव्य स्मारक व्हावे, अशी मागणी शासनाकडे करणार आहे. यासाठी एमएमआरडीएची दीड एकर जागा मिळावी, असे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी दिली. आठवले यांनी चरी गावाला भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शासनाने यापूर्वी स्मारकासाठी एक कोटी निधी मंजूर केला होता. मात्र गावात जागा नसल्याने स्मारकाचा प्रश्न प्रलंबित राहिला. अलिबाग-वडखळ रस्त्याजवळ एमएमआरडीएची जागा आहे. यापैकी दीड एकर जागा स्मारकासाठी मागणी करणार आहे. स्मारक बांधण्यासाठी पाच ते सहा कोटी निधीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे, असे आठवले यांनी सांगितले. डॉ. आंबेडकर हे चरी सत्याग्रह दरम्यान या गावात आले होते. शेतकऱ्यावरील खटला त्यांनी लढला होता, या घटनेला आठवले यांनी उजाळा दिला.
स्मारकामध्ये हॉल, पुस्तकालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी संग्रह असे स्मारक उभारले जाणार आहे, असेही ते म्हणाले.