सभापती जाणणार डोंबिवलीच्या व्यथा!
By Admin | Updated: June 29, 2016 03:06 IST2016-06-29T03:06:00+5:302016-06-29T03:06:00+5:30
महापालिका प्रशासनाकडून डोंबिवलीला नेहमीच सापत्न वागणूक मिळत आहे.

सभापती जाणणार डोंबिवलीच्या व्यथा!
कल्याण : महापालिका प्रशासनाकडून डोंबिवलीला नेहमीच सापत्न वागणूक मिळत आहे. आयुक्त ई. रवींद्रन डोंबिवलीतील नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात येतात. मात्र, महापौर राजेंद्र देवळेकर यांना त्यांच्याच घोषणेचा विसर पडला आहे. त्यामुळे महापौर गेले कुणीकडे?, असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. परंतु, आता जुलैपासून स्थायी समितीचे सभापती संदीप गायकर यांनी स्थायीच्या बैठकीच्या दिवशी दुपारी या कार्यालयात बसण्याचा निर्णय घेतला आहे.
डोंबिवली विभागीय कार्यालयांतर्गत ग, फ, ह आणि ई प्रभाग आहेत. डोंबिवलीसाठी पूर्णवेळ उपायुक्त नेमावा, अशी मागणी कित्येक वर्षांपासून होत आहे. परंतु, आजतागायत ती पूर्ण झालेली नाही. २०१०च्या निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर पूर्णवेळ उपायुक्त नेमण्याची घोषणा तत्कालीन
आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी केली होती.
मात्र २०१५ निवडणूक होऊनही याची अंमलबजावणी झालेली नाही. जे उपायुक्त नेमले जातात, ते डोंबिवलीला फिरकतही नाहीत. त्यामुळे डोंबिवलीतील नागरिकांना समस्या मांडण्यासाठी कल्याणला महापालिकेचे मुख्यालय गाठावे लागते. त्यामुळे आयुक्त रवींद्रन दरमहिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी डोंबिवली कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतात. परंतु, त्या दिवशी महासभा अथवा अन्य काही महत्त्वाचे काम आल्यास तेही डोंबिवलीत येत नाहीत.
महापौरपदी निवडून आल्यानंतर राजेंद्र देवळेकर यांनी डोंबिवली दौऱ्यात महिन्यातून एक दिवस डोंबिवलीत येऊन नागरिकांच्या तक्रारी जाणून घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या अगोदर महापौर कल्याणी पाटील यांनीही असा दावा केला होता. परंतु, कालांतराने त्यांनी त्याचा विसर पडला. तोच कित्ता देवळेकर गिरवत आहेत. (प्रतिनिधी)
>दुपारी ३ च्या सुमारास भेटणार
डोंबिवलीला कोणी वाली नसल्याने आता गायकर येथील नागरिकांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. स्थायी समितीची बैठक ते सकाळी ११ वाजता घेणार आहेत. ती आटपून दुपारी ३ च्या सुमारास ते डोंबिवली विभागीय कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. दरम्यान, एकंदरीत यापूर्वीचा अनुभव पाहता अन्य पदाधिकाऱ्यांप्रमाणेच त्यांनीही केलेला दावा कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शहरातील समस्या गंभीर : पदाधिकारी आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी शहराला दाखविलेली पाठ पाहता येथील अधिकारी आणि बेफीकीर झाले आहेत. यात फेरीवाला, अतिक्रमण, वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहेत. शहर स्वच्छतेचेही तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे.