केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांकडून डोंबिवलीच्या प्रदूषणाची दखल
By Admin | Updated: September 25, 2014 05:21 IST2014-09-25T05:21:01+5:302014-09-25T05:21:01+5:30
गेल्या १५ दिवसांपासून डोंबिवली परिसरात प्रदूषणाची समस्या प्रकर्षाने भेडसावत असून वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत

केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांकडून डोंबिवलीच्या प्रदूषणाची दखल
अनिकेत घमंडी, डोंबिवली
गेल्या १५ दिवसांपासून डोंबिवली परिसरात प्रदूषणाची समस्या प्रकर्षाने भेडसावत असून वारंवार होणा-या अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परिणामी, सजीवांच्या जीवस्वास्थ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना होणे अत्यावश्यक असल्याची मागणी करून डोंबिवलीतील नागरिकांसह सामाजिक संस्थांनी घातलेल्या साकड्याची केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, दिल्ली बोर्ड यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे.
त्यानुसार, याबाबत लवकरच एक उच्चस्तरीय समिती नेमून तिचा अहवाल मागवण्यात येणार असल्याचे आश्वासन पर्यावरणमंत्र्यांचे स्वीय सहायक गणेश रामदासी यांनी दिले. दक्ष नागरिक संघ आणि ईगल ब्रिगेड संस्थेच्या माध्यमातून त्यांच्याकडे याबाबतची सर्व माहिती दिली
होती. त्यानुसार, तेथून गणेश यांनी संस्थेचे पदाधिकारी विश्वनाथ बिवलकर यांना बुधवारी ही माहिती दिली. पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर हे परदेशी असून दोन दिवसांत
भारतात आल्यावर याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यांनी दिलेल्या निवेदनात एमआयडीसी परिसरात जाणवणारी ही समस्या
आता पांडुरंगवाडी, गांधीनगर,
आयरे रोड, पाटकर विद्यालय परिसर इतकेच नव्हे तर जुनी डोंबिवली, डोंबिवली पश्चिमेपर्यंत पोहोचली असून त्याचा त्रास शेकडो
रहिवाशांना होत आहे.