डास व अळ्यांची तपासणी पुण्याची चमू करणार
By Admin | Updated: September 19, 2014 00:51 IST2014-09-19T00:51:08+5:302014-09-19T00:51:08+5:30
जिल्ह्यात डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले असून आतापर्यंत सहा जणांचा बळी घेतला आहे. यातील एक मृत्यू या आजाराने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र इतर मृत्यू नेमके कशाने झाले, याची शहानिशा

डास व अळ्यांची तपासणी पुण्याची चमू करणार
वर्धेत डेंग्यूचे १०२ रुग्ण : आतापर्यंत ११७६ रक्त नमुन्यांची तपासणी
रूपेश खैरी - वर्धा
जिल्ह्यात डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले असून आतापर्यंत सहा जणांचा बळी घेतला आहे. यातील एक मृत्यू या आजाराने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र इतर मृत्यू नेमके कशाने झाले, याची शहानिशा न झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
वरवर डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे दिसत असली तरी इतर वेगळी लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येत असल्याची बाब निष्पन्न झाली आहे. हा आजार नेमका कोणता याचा शोध घेण्यासाठी खुद्द पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेची चमू शुक्रवार दि. १९ रोजी वर्धेत येणार आहे. ही चमू डास व डास अळीसह रुग्णांचे रक्तनमुने घेणार आहे.
गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यात डेंग्यूसदृश आजाराचा प्रकोप आहे. बुधवारपर्यंत तब्बल एक हजार १७६ रक्तनमुने तपासण्यात आले. यापैकी १०२ जणांना डेंग्यूची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र डेंग्यूचा उपचार करुनही ते रुग्ण बरे होत नसल्यामुळे आरोग्य विभाग हतबल झाला आहे.
सदर बाबीची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने वरिष्ठांपर्यंत पोहोचविली आहे. याची गंभीर दखल घेत पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेची चमू वर्धेत दाखल होणार आहे. ही चमू केवळ वर्धेतच नाही तर विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्येही जाणार आहे. दरम्यान, डास व डासअळी तसेच डेंग्यूच्या रुग्णांचे रक्तनमुने संकलित करणार आहे. यापूर्वी भंडारा येथे या प्रकारची तपासणी करण्यात आली आहे. त्या सर्व नमुन्यांवर पुणे येथे राष्ट्रीय विषाणू संस्थेत अभ्यास केला जाणार आहे. डासांची वाढलेली शक्ती व त्यांच्यापासून लागण झालेल्या रोगावर प्रभावी औषधोपचार काय असू शकेल, या अनुषंगाने पावले उचलली जाणार आहेत. रुग्णांमध्ये आढळत असलेल्या इतर लक्षणांचा देखील ही चमू अभ्यास करणार आहे.