‘त्यांना’ गद्दार म्हणायचे की काय, तुम्हीच ठरवा!
By Admin | Updated: May 15, 2016 00:34 IST2016-05-15T00:34:58+5:302016-05-15T00:34:58+5:30
उगवत्या सूर्याला नमस्कार याप्रमाणे राष्ट्रवादी काँगे्रसला सोडून भाजपात उडी घेणाऱ्यांना ‘गद्दार’ म्हणायचे की आणखी काय, हे जनतेने ठरवावे, अशी टीका राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले आमदार

‘त्यांना’ गद्दार म्हणायचे की काय, तुम्हीच ठरवा!
सांगवी : उगवत्या सूर्याला नमस्कार याप्रमाणे राष्ट्रवादी काँगे्रसला सोडून भाजपात उडी घेणाऱ्यांना ‘गद्दार’ म्हणायचे की आणखी काय, हे जनतेने ठरवावे, अशी टीका राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले आमदार, शिक्षण मंडळाचे सदस्य आणि नगरसेवक यांच्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सांगवी येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
महापालिकेच्या विविध विकासकामांची भूमिपूजने, उद्घाटने शनिवारी अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शहरात गटातटाचे राजकारण कधी नव्हते. १९९१पासून हे सुरू आहे. गटातटाचे राजकारण चालूच असते. मी कधी गटतट मानणारा नाही. केवळ शहराच्या विकासासाठी मला काम करायचे आहे. तर संभाजीनगर येथील कार्यक्रमात पवार म्हणाले की, पिंपरी महापालिका पदाधिकारी चुकत असतील, तर मला सांगा. त्यांना जाब विचारतो. नगरसेवक हे विश्वस्त असून, महापालिकेचे मालक नाहीत, हे लक्षात ठेवायला हवे. मात्र, राष्ट्रवादी नगरसेवकांवर बिनबुडाचे आरोप करू नका. कुणाला कुठले आरोप करायचे, ते करू द्या. प्रत्येकाला मी उत्तर देण्यापेक्षा माझी खुली चौकशी सुरू असून, त्यातून सत्य बाहेर येईल. चौकशी संपल्यानंतर काय वस्तुस्थिती आहे, ती येईल. चौकशीत शहानिशा केली जाईल. चूक असेल, त्याला किंमत मोजावी लागेल. चूक नसल्यास जी काही भूमिका असेल, ती पुढे येईल. भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात. (वार्ताहर)मोठी किंमत चुकवावी लागली
मागे एका ठिकाणी गावंढळ भाषेत बोललो, त्याची मोठी किंमत चुकवावी लागली. ग्रामीण भागात गावरान भाषेत बोललो की, लोकांना लगेच कळते. शहरी भागात मात्र तसे काही नाही. चुकून जरी भाषणात गावंढळ शब्दाचा उल्लेख आला की, लगेच ‘हेडलाइन’ तयार होते. माणूस अनुभवातून शिकतो. मीदेखील बरंच काही शिकलोय, असेही ते म्हणाले.
रस्ते खोदाई करणाऱ्यांवर फौजदारी करा
शहरभर फिरत असताना अनेक ठिकाणी रस्ते खोदकाम झाल्याचे पाहायला मिळाले. पदपथही उकरण्यात आले आहेत. ही रस्तेखोदाई विनापरवाना असल्याची माहिती मिळाली. महापालिकेची परवानगी न घेताच कोण दिवसाढवळ्या खोदकाम करत असेल, तर त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश अजित पवार यांनी दिले.फरक पडत नाही
निवडणुका जवळ आल्या की, अनेक जण या पक्षातून त्या पक्षात जात असतात. ठरावीक लोक गेल्यास त्यांच्या मागे जनता जात नसते. आमच्याही पक्षात अनेक जण येणार आहेत. माझ्या विरोधात ज्याला काम करायचे आहे, त्यांनी खुशाल करावे, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये केलेला प्रवेश आणि शहरातील गटातटाचे राजकारण याबाबत बोलताना व्यक्त केले.