संघाला नको राजकीय संरक्षण
By Admin | Updated: May 31, 2014 01:01 IST2014-05-31T01:01:09+5:302014-05-31T01:01:09+5:30
देशात पूर्ण बहुमत मिळून भाजपाचे सरकार आले ही गोष्ट चांगली आहे. आता देशात सुशासन आणण्याची त्यांची जबाबदारी आहेच. भाजपा सत्तेत आल्यामुळे संघाला लाभ होईल, अशा चर्चा सुरू आहेत.

संघाला नको राजकीय संरक्षण
कलम ३७0 वर चर्चा आवश्यकच : भाजपवर सुशासनाची जबाबदारी
नागपूर : देशात पूर्ण बहुमत मिळून भाजपाचे सरकार आले ही गोष्ट चांगली आहे. आता देशात सुशासन आणण्याची त्यांची जबाबदारी आहेच. भाजपा सत्तेत आल्यामुळे संघाला लाभ होईल, अशा चर्चा सुरू आहेत. परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारे राजकीय संरक्षणाची आवश्यकता नाही, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्टोक्ती करण्यात आली आहे. नागपूर येथील रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात तृतीय वर्ष संघ शिबिर सुरू आहे. यासंदर्भात माहिती देण्याकरिता आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान संघाचे अखिल भारतीय सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यांनी वरील मत व्यक्त केले.
देशात सध्या जम्मू व काश्मीरमधील ३७0 कलमावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात संघाची भूमिका अगोदरपासूनच स्पष्ट आहे. देशातील कुठल्याही राज्यात भेदभाव होता कामा नये व सर्वांंंना समान अधिकार देण्याची गरज आहे. ३७0 कलम आले त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीदेखील त्याला विरोध केला होता. भाजपाने सत्तेवर येण्याअगोदर ३७0 संदर्भात आश्वासन दिले होते. आता या मुद्यावर चर्चा व्हायलाच हवी, असे डॉ. कृष्णगोपाल म्हणाले.
‘एफडीआय’ला अप्रत्यक्षपणे विरोध
मोदी सरकार संरक्षण क्षेत्रात १00 टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याचा विचार करत आहे, असे वृत्त शुक्रवारी समोर आले. यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘दक्ष’ भूमिका घेतली असली तरी अप्रत्यक्षरीत्या याला विरोध केला आहे.
विदेशी कंपन्यांचे सहकार्य घेऊन देशातील संरक्षण क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि विकास झाला तर ते चांगलेच आहे. परंतु संरक्षण विभागावर देशाच्या सुरक्षेची भिस्त आहे.
त्यामुळे यात परावलंबी राहणे हे भविष्याच्या दृष्टीने योग्य नाही. यासंदर्भात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे मत संघातर्फे मांडण्यात आले. आजच्या घडीला संरक्षण क्षेत्रात फक्त २६ टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी आहे हे विशेष. (प्रतिनिधी)