सत्तेचा दर्प डोक्यात जाऊ देऊ नका - शरद पवार
By Admin | Updated: November 1, 2015 01:27 IST2015-11-01T01:27:23+5:302015-11-01T01:27:23+5:30
राज्यकर्ते आहात, राज्यकर्त्यांसारखे वागा, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. सत्तेचा दर्प डोक्यात गेल्यास, अशी सत्ता
सत्तेचा दर्प डोक्यात जाऊ देऊ नका - शरद पवार
मुंबई : स्वातंत्र्याच्या इतिहासाची चिरफाड करण्याचा अधिकार कोणालाच नाही. स्वातंत्र्यसैनिकांना मान देताना त्यांची जातपात पाहू नका. राज्यकर्ते आहात, राज्यकर्त्यांसारखे वागा, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. सत्तेचा दर्प डोक्यात गेल्यास, अशी सत्ता उलथवून टाकायलाही जनता कमी करत नाही. ती वेळ येऊ देऊ नका, असा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला.
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने वरळी येथील जांबोरी मैदानात सरकारच्या वर्षभराच्या कामकाजाचा पंचनामा करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन केले. यावेळी बोलताना पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर कठोर टीका केली. केंद्र सरकारच्या जाहिरातीत इंदिरा गांधींचा उल्लेख टाळण्यात आला. त्याचवेळी सरदार पटेलांच्या सोबत नरेंद्र मोदींचे फोटो छापण्यात आले. ज्या सरदार पटेलांच्या गृहमंत्रालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली, त्यांच्या छायाचित्राचा अशाप्रकारे गैरवापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा इतिहासाची चिरफाड करण्याचा प्रयत्न असल्याचे पवार म्हणाले. भाजपा नेत्यांच्या बेताल वक्तव्यांचा संदर्भ देत पवार म्हणाले की, ‘दहशतवाद आणि दमबाजी रोखण्याची जबाबदारी सरकारची असते. मात्र, देशात जाणीवपूर्वक धार्मिक संघर्ष पेटविण्याचे काम काही शक्ती करीत आहेत. देशाचे ऐक्य उद्ध्वस्त करण्याचा या प्रयत्नांना राज्यकर्त्यांची फूस आहे. नरेंद्र मोदींनी लोकांची परीक्षा पाहू नये.’
सरकारला पाठिंबा देणारेच साठेबाज आहेत
सगळ्याच डाळींचे भाव २०० पट वाढले. एकीकडे देशात डाळीचे भाव वाढले असताना ५.४० लाख टन डाळ मुंबई बंदरातील जहाजांमध्ये अडकून पडली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ही डाळ बाजारात येऊ शकत नाही. ज्या व्यापाऱ्यांनी या सरकारला पाठिंबा दिला, त्यांनीच साठेबाजारी केली आहे. त्यांची कमाई होईपर्यंत इतरांना डाळ आणू द्यायची नाही, असे सरकारचे धोरण असल्याची टीका पवारांनी केली. (प्रतिनिधी)