सेनेच्या धमक्यांना भीक घालत नाही
By Admin | Updated: November 1, 2015 00:24 IST2015-11-01T00:24:44+5:302015-11-01T00:24:44+5:30
भाजपा-शिवसेनेत पडलेली मतभेदांची दरी वाढत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला तडीपार करण्याच्या दिलेल्या धमकीला आम्ही घाबरत नाही, अशा शब्दांत भाजपाचे

सेनेच्या धमक्यांना भीक घालत नाही
नागपूर : भाजपा-शिवसेनेत पडलेली मतभेदांची दरी वाढत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला तडीपार करण्याच्या दिलेल्या धमकीला आम्ही घाबरत नाही, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी शिवसेनेला ठणकावले.
कुणी कुणाला तडीपार करू शकत नाही. तडीपार मतदारच करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलेले सेनेनेही ऐकले असेलच. शिवसेनेकडून सातत्याने होत असलेली टीका भाजपा यापुढे तेवढ्याच गांभीर्याने घेईल, असे संकेत दानवे यांनी राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित लोकसंवाद मेळाव्यात दिले.
पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, राज्यात भाजपाचे सरकार आहे. शिवसेनेचे सरकारला समर्थन आहे. मंत्रिमंडळात भाजपसोबत शिवसेनेचेही मंत्री आहेत. त्यामुळे शिवसेनेने टीका करणे गैर असून भविष्यात त्यांनी टीका करणे टाळावे. उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याचा इशारा दिला. हे नाटक आहे. मंत्रिमंडळात एकत्रित निर्णय घेतले जातात. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आजवर शिवसेनेच्या एकाही मंत्र्याने विरोध केला नाही. भाजपा- शिवसेनेची युती निवडणुकीनंतर झाली आहे. सत्तेबाहेरील काही विषयांवर भाजपा- सेनेत मतभेद आहेत. दोन्ही पक्षांत समन्वय साधण्यासाठी एक समिती यापूर्वीच स्थापन करण्यात आली आहे. येत्या काळात समितीच्या बैठका होतील, असे स्पष्ट करीत सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
मान-सन्मान राहिला कुठे ?
शिवसेनेकडून सातत्याने होत असलेल्या टीकेवर दानवे म्हणाले, ‘मान-सन्मान दोन्ही बाजूंकडून व्हायला हवा. शिवसेना ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करीत आहे, हे पाहता मान-सन्मान राहिला कुठे?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.