मेघे बंधूंचे भाजपात सन्मानजनक पुनर्वसन
By Admin | Updated: June 22, 2014 01:07 IST2014-06-22T01:07:54+5:302014-06-22T01:07:54+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खा. दत्ता मेघे हे पुत्र सागर व समीर यांच्यासह लवकरच भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत. त्यांच्या दोन्ही पुत्रांचे भाजपमध्ये सन्मानजनक पुनर्वसन केले जाणार आहे.

मेघे बंधूंचे भाजपात सन्मानजनक पुनर्वसन
श्रेष्ठींपुढे नवा फॉर्म्युला : सागर देवळीतून, समीर परिषदेसाठी लढणार ?
कमलेश वानखेडे - नागपूर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खा. दत्ता मेघे हे पुत्र सागर व समीर यांच्यासह लवकरच भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत. त्यांच्या दोन्ही पुत्रांचे भाजपमध्ये सन्मानजनक पुनर्वसन केले जाणार आहे. सूत्रानुसार सागर यांनी देवळीतून विधानसभेची तर समीर यांनी पुढील वर्षी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढावी, असा पर्याय पक्षश्रेष्ठींना पटवून देण्यात भाजप नेत्यांना यश आले आहे. त्यामुळे पश्चिम नागपूर मतदारसंघात आ. सुधाकरराव देशमुख व मध्य नागपुरात आ. विकास कुंभारे यांचे समर्थक काहीसे रिलॅक्स झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत वर्धेतून काँग्रेसकडून लढलेले सागर मेघे यांचा पराभव झाला. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय परिवहन आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दत्ता मेघे यांना ‘मैत्री’चा हात पुढे करताच मेघेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हे करीत असताना त्यांनी पुत्रांच्या राजकीय पुनर्वसनाला प्राधान्य दिले. मेघे पुत्रांच्या एन्ट्रीमुळे भाजपमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले. येत्या विधानसभा निवडणुकीत सागर व समीर हे कुठून लढतील, याबाबत तर्कवितर्क लावले गेले. त्याचवेळी समीर यांच्या पुनर्वसनासाठी आपल्या नेत्यावर तर गंडांतर येणार नाही, अशी धास्ती आ. सुधाकरराव देशमुख व आ. विकास कुंभारे यांच्या समर्थकांनी घेतली. पश्चिममध्ये दीड हजारावरील लिड ३८ हजारावर नेणाऱ्या सुधाकररावांना थांबविणे कितपत योग्य, असा सवाल पश्चिमचे कार्यकर्ते करू लागले. कुंभारे यांना थांबविले तर हलबा समाजात प्रतिक्रिया उमटण्याचा धोका आहे. दक्षिणच्या इच्छुकांमध्येही धुसफूस सुरु आहे. यामुळे पक्षांतर्गत नाराजीचा सूर आळवला जाऊ लागला आहे. सत्तासुख घेण्याच्या काळात पक्षांतर्गत असी धुसफूस नको म्हणून भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेत पक्षश्रेष्ठींसमोर हा विषय मांडला. सागर यांना देवळीतून विधानसभेचे तिकीट द्यावे. दत्ताभाऊंचे शिष्य व वर्धेचे नवनिर्वाचित खासदार रामदास तडस हे सागर यांना सहज निवडून आणतील. समीर यांना नागपुरातून विधानसभेचे तिकीट न देता पुढील वर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरवावे. या महागड्या निवडणुकीसाठी पक्षाला सक्षम उमेदवार मिळेल. काँग्रेसकडे असलेली ही जागा भाजपला खेचता येईल. याच जागेवर सागर हे भाजपकडून जिंकले होते. या अडजेस्टमेंटमुळे विद्यमान आमदांरावर गदा येणार नाही. मेघे बंधूंचे राजकीय पुनर्वसन होईल व पक्षातील अस्वस्थताही कमी होईल. हा फॉर्म्युला पक्षश्रेष्ठींना पटवून देण्यात नेत्यांना यश आले आहे.
मेघे-मुळक राजकीय संघर्ष टळणार !
मेघे- मुळक यांचे कौटुंबिक संबंध आहेत. राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी पश्चिममधून लढण्याची तयारी चालविली आहे. अशात समीर मेघे यांनीही भाजपकडे पश्चिमसाठी दावेदारी केली.दोघांनीही माघार घेतली नाही तर या दोन कुटुंबात राजकीय संघर्ष होण्याची चिन्हे होती. नव्या फार्म्युल्यानुसार समीर थांबले तर मेघे-मुळक यांच्यातील राजकीय संघर्षही टळू शकतो.