- यदु जोशीमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचे विलिनीकरण लगेच होईल असे सध्यातरी दिसत नाही. सत्तेत असलेला अजित पवार गट हा त्याबाबत फारसा उत्सुक नसल्याचे दिसत आहे. त्याचवेळी शरद पवार गट मात्र विलिनीकरणाची आशा बाळगून असल्याचे चित्र असले तरी त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
अजित पवार हयात असताना विलिनीकरणाबाबत दोन्ही गटांच्या पाच-सहा बैठका झाल्या होत्या आणि ११ फेब्रुवारीला दोन्ही पक्षांच्या राष्ट्रीय कार्यकारिणींची एकत्रित बैठक मुंबईत घेऊन विलिनीकरण करायचे असा निर्णय झालेला होता, असा दावा शरद पवार गटाच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना केला.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी विलिनीकरणाबाबत दोन्ही गटांच्या बैठका झाल्या होत्या आणि स्वत: अजित पवार यांनी महापालिकांच्या निवडणुकीनंतर विलिनीकरण करूयात असे म्हटले असल्याचा दावा केला आहे. नंतर जिल्हा परिषद निवडणूक आली तेव्हा ते राहिले पण पुन्हा विलिनीकरणाबाबत दोन्ही बाजूंच्या नेत्यांची चर्चा झालेली होती आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर विलिनीकरण करण्याचे ठरले होते, असे शिंदे यांनी म्हटले आहे. शिंदे यांच्या विधानाचा अर्थ असा घेतला जात आहे, की विलिनीकरण ही अजितदादांची इच्छा होती हे सांगून ते अजित पवार गटाला विलिनीकरण लवकरात लवकर करण्याची एकप्रकारे गळ घालत आहेत.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मात्र तूर्तास विलिनीकरणाऐवजी अजित पवार यांच्या निधनानंतरच्या परिस्थितीत पक्षाची घडी बसविणे आणि सरकारमधील आपला सहभाग यावरच लक्ष केंद्रित केले असल्याचे एकूणच हालचालींवरून दिसत आहे.
चर्चा नंतर करू : तटकरे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांना सांगितले की, विलिनीकरणाबाबत माझी आमच्या नेत्यांसोबत चर्चा झालेली नाही. आज आमच्यासमोर प्रश्न आहे तो विधिमंडळ पक्षनेता निवडणे. याच गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे म्हणाले, की आम्ही आज दु:खद वातावरणात आहोत. सर्व विषयांची चर्चा ही नंतर होईल.
भाजपची भूमिका काय? राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येण्यासंदर्भात भाजपची भूमिका महत्त्वाची असेल. अजित पवार गटाकडे सुनील तटकरे हे एकमेव लोकसभा सदस्य आहेत. शरद पवार गटाकडे मात्र आठ खासदार आहेत. उद्या दोन्ही पक्ष एकत्र येऊन एनडीएसोबत गेले तर भाजपला केंद्र सरकारमध्ये त्याचा फायदा होईल. आज नितीशकुमार यांच्या जनता दलाचा जो दबाव काही बाबतीत मानावा लागतो तो मानण्याचे दडपण नसेल.
विलीनीकरणात अडचण काय?विलीनीकरण केले तर शरद पवार गटाच्या नेत्यांना केंद्रीय वा राज्य मंत्रिमंडळात कसे सामावून घ्यायचे हा मोठा प्रश्न असेल. महाराष्ट्रात अजित पवार यांच्या व्यतिरिक्त एकच मंत्रिपद रिक्त आहे आणि ते भाजपच्या कोट्यातील आहे. शरद पवार गटातील तीन-चार जणांना मंत्रिपद द्यायचे तर अजित पवार गटातील काही मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे लागतील. तसे केले तर नाराजी पसरेल, असे अजित पवार गटाला वाटते. विलिनीकरणाबाबत अजित पवार गट उत्सुक नसण्याचे ते कारण मानले जाते.
Web Summary : NCP factions differ on merger. Ajit Pawar's group shows reluctance, prioritizing party stability after recent events. Sharad Pawar's group hopes for unity, but faces challenges in accommodating leaders post-merger, especially regarding ministerial positions, creating internal resistance within the Ajit Pawar faction.
Web Summary : एनसीपी गुटों में विलय पर मतभेद हैं। अजित पवार गुट अनिच्छुक दिख रहा है, हाल की घटनाओं के बाद पार्टी की स्थिरता को प्राथमिकता दे रहा है। शरद पवार गुट एकता की उम्मीद कर रहा है, लेकिन विलय के बाद नेताओं को समायोजित करने में चुनौतियों का सामना कर रहा है, खासकर मंत्री पदों को लेकर, जिससे अजित पवार गुट के भीतर आंतरिक प्रतिरोध पैदा हो रहा है।