भक्तांना घेता येईल आता वैद्यनाथाचे स्पर्श दर्शन
By Admin | Updated: July 30, 2016 20:32 IST2016-07-30T20:32:39+5:302016-07-30T20:32:39+5:30
परळी येथील वैद्यनाथाच्या पिंडीवरील चांदीच्या आवरणावरून निर्माण झालेला वाद मिटला असून अभिषेकापुरतेच चांदीचे आवरण ठेवावे आणि त्यानंतर ते काढून टाकावे असा आदेश देण्यात आला आहे

भक्तांना घेता येईल आता वैद्यनाथाचे स्पर्श दर्शन
>ऑनलाइन लोकमत -
बीड, दि. 30 - बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथाच्या पिंडीवरील चांदीच्या आवरणावरून निर्माण झालेला वाद आता धर्मादाय आयुक्तांच्या समोर तडजोडीने मिटला असून अभिषेकापुरतेच चांदीचे आवरण ठेवावे आणि त्यानंतर ते काढून टाकावे, असा आदेश धर्मादाय आयुक्तांनी शनिवारी दिला.
वैद्यनाथाच्या मुर्तीची झीज होत असल्याचे सांगत देवस्थान कमिटीने पिंडीला चांदीचे आवरण घातले होते. पिंडीला स्पर्श करून दर्शन घेण्याची परंपरा असलेल्यामुळे भक्तांमध्ये आवरणावरून नाराजी होती. यासंदर्भात धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी आवरण काढून टाकण्याची मागणी केली होती.
शनिवारी ट्रस्टचे अध्यक्ष तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर आणि बियाणी यांच्यात आयुक्तांच्या कार्यालयात तडजोड झाली आणि लोकभावना लक्षात घेत अभिषेकाचा कालावधी वगळून हे चांदीचे आवरण काढून टाकण्यात यावे, असा निर्णय झाला. दररोज पूजा अर्चा करण्याची वेळ पहाटे तीन ते पाच अशी असून ती परंपरेने राहिल. पहाटे पाच ते दुपारी दोन वाजेपर्यंतची वेळ अभिषेकाची असल्याने या कालावधीत पिंडीवर आवरण राहिल. दुपारी दोन वाजता हे आवरण काढून टाकण्यात येईल. त्यामुळे दुपारी दोन वाजल्यानंतर भक्तांना स्पर्श दर्शन घेता येईल. रविवारपासून या निर्णयाची अमंलबजावणी सुरू होत आहे.