मुंबई - मागील काही दिवसांपासून सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याच्या चर्चा आहे. त्यात खासदार संजय राऊतांनीही मंत्रालयात अंडरवर्ल्ड सुरू आहे. राजकीय अराजकता निर्माण झालीय असा आरोप केला. त्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा करत सरकारमध्ये कोल्ड वॉर नव्हे तर महाराष्ट्र विकास विरोधी लोकांशी वॉर आहे असा खोचक टोला लगावला आहे.
मुंबईत माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, सत्तेच्या खुर्चीसाठी २०१९ मध्येच त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना डॅमेज केले. हिंदुत्वाला डॅमेज केले. शिवसेनेला डॅमेज केले. आता आभाळ फाटलंय त्याला कुठे कुठे ठिगळ लावणार? महाविकास आघाडीसारखा आमचा खुर्चीचा अजेंडा नाही तर महायुतीचा अजेंडा हा सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये बदल घडवणे आणि त्यांना न्याय देणे, राज्याला पुढे नेणे आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच राज्यातील महत्वाच्या पायाभूत सेवा प्रकल्पांचा आढावा घेणारी एकच वॉर रुम आहे. नवीन व़ॉर रुम उघडली नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांकडील खात्यांचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. हा कक्ष व़ॉर रुमशी संलग्न आहे. त्यामुळे महायुतीत कोल्ड वॉर नाही तर महाराष्ट्र विकास विरोधी लोकांशी वॉर आहे असा खोचक टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
दरम्यान, शासन निर्णय ३१ ऑक्टोबर २०२३ नुसार उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या राज्याचा विकास करणे हाच महायुतीचा अजेंडा आहे. महायुती सरकारमध्ये कोणतीही समांतर यंत्रणा नाही. उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता कक्षात वैद्यकीय मदतीचे जे अर्ज येतील, त्यांना मदत केली जाईल. यापूर्वी काहीजण मुख्यमंत्री असताना एकदाच मंत्रालयात आले होते असं सांगत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला.
"लोक सोडून का चाललेत त्याचे आत्मपरीक्षण करा"
शिवसेना पक्ष हा बाळासाहेबांच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा पक्ष कार्यकर्त्यांना बळ देणारा आहे. तुम लढो हम कपडा संभालता है या विचारांचा नाही. आज शिवसेनेत मोठ्या संख्येने लोक येत आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतोय पण ज्यांना सोडून लोक जात आहेत त्यांनी त्यावर आत्मपरीक्षण करायला हवे असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.