Deputy CM Ajit Pawar On Caste Based Census Decision: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशात जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा मोदी सरकारने केली. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारच्या या निर्णायाचे स्वागत केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत या निर्णयाबाबत आपली भूमिका मांडली आहे.
देशात सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार. केंद्र सरकारचा जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून यामुळे सर्व समाजघटकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यास मदत करेल. सामाजिकदृष्ट्या दुर्बल, वंचित व उपेक्षित घटकांच्या विकासासाठी सरकारला अधिक निधी प्रदान करता येईल. त्यामुळे मागास समाजघटकांचा शैक्षणिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे ध्येय अधिक वेगाने साध्य करता येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
समाजातील सर्व घटकांना विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देणारा ठरेल
जातिनिहाय जनगणना करण्याची अनेक व्यक्ती, संस्था आणि संघटना गेल्या अनेक दशकांपासून सातत्याने मागणी करीत आहेत. ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या दूरदृष्टीपूर्ण व संवेदनशील नेतृत्वामुळे पूर्णत्वास जाऊ शकली. जातिनिहाय जनगणना नसल्यामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता इतर जातींच्या लोकसंख्येच्या आर्थिक व सामाजिक स्थितीबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे याचा परिणाम ओबीसी समाजासह अन्य इतर समाजघटकांनाही भोगावा लागत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय समाजातील सर्व घटकांना विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देणारा ठरेल तसेच भविष्यात जातीव्यवस्था संपूर्णतः संपुष्टात आणण्यास मदत करणारा ठरेल, असा विश्वास आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीपाठोपाठ शरद पवार गटाकडूनही या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातिनिहाय जनगणनेला मान्यता देण्यात आली असून लवकरच देशात जातनिहाय जनगणना होणार आहे. मी या निर्णयाचा सहर्ष स्वागत करतो. गेल्या अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी आम्ही मागणी करत होतो. जातनिहाय जनगणनेमुळे आपल्या देशातील समतेचा विचार आणखीन दृढ होईल याबाबत मला विश्वास आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.