प्रेमविवाह करणार्या मुलीला संपत्तीचा वाटा नाकारला!
By Admin | Updated: May 20, 2014 21:30 IST2014-05-20T21:23:17+5:302014-05-20T21:30:10+5:30
पित्याने लिहून घेतले प्रतिज्ञापत्र

प्रेमविवाह करणार्या मुलीला संपत्तीचा वाटा नाकारला!
अकोला: आपल्या मर्जीने प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करणार्या मुलीला पित्याच्या संपत्तीतील काही वाट्यावर हक्क सांगता येणार नाही, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र एका पित्याने मुलीकडून लिहून घेतल्याची घटना नुकतीच खदान पोलिस ठाण्यात घडली. या घटनेची पोलिस ठाण्यात चांगलीच चर्चा रंगली होती.
कौलखेड भागात राहणार्या एक २४ वर्षीय युवतीचे परिसरातील २८ वर्षीय युवकासोबत सूत जुळले. दोघांनी सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्या. अनेक महिन्यांपासून प्रेमप्रकरण चांगलेच रंगात आले. दोघांनी लग्न करण्याचा मनोदय एकमेकांशी बोलून दाखवला; परंतु दोघांनाही आपल्या लग्नाला कुटुंबीयांकडून विरोध होण्याची शक्यता असल्याने पळून जाऊन लग्न केलेले बरे. लग्न केल्यानंतर कुटुंबीयांचा विरोध कमी होईल, या विचाराने युवती युवकासोबत पळून गेली. मुलगी घरी परतली नसल्याने चिंताग्रस्त झालेल्या पित्याने नातेवाइकांसह मुलीच्या मैत्रिणींकडे चौकशी केली; परंतु मुलगी आढळून न आल्याने पित्याने खदान पोलिस ठाण्यात येऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. आठ दिवसानंतर पळून गेलेली युवती प्रियकरासोबत खदान पोलिस ठाण्यात हजर झाली. पोलिसांना आम्ही लग्न केल्याचे सांगत सर्व कागदपत्रे दाखविली. पोलिसांनी पित्याला मुलगी परत आल्याची सूचना दिली. मुलीचा पिता लगेच खदान पोलिस ठाण्यात हजर झाले. मुलीने त्यांना लग्न केल्याची माहिती दिली. पित्याने झाले गेले ते विसरून जा आणि घरी परत ये, असे सांगितले; परंतु मुलगी ऐकायला तयार नव्हती. पित्याने पुन्हा समजूत घालण्याचा प्रयत्न केल्यानंतरही मुलगी तिच्या निर्णयावर ठाम असल्याचे पाहून पित्याचे डोके फिरले. आजपासून तू आम्हाला मेली. आमच्यासोबत कोणताही संबंध ठेवायचा नाही असे सांगत, माझ्या वडिलोपार्जित संपत्तीमधील एक दमडीदेखील मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. मुलीनेसुद्धा तुमच्या संपत्तीची मला गरज नसल्याचे पित्याला ठणकावून सांगितल्यावर पित्याचे पित्त आणखीनच खवळले. त्याने ठाण्याबाहेर जाऊन एक प्रतिज्ञापत्र लिहून आणले. त्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्वखुशीने पित्याच्या संपत्तीवरील हक्क सोडत आहे. माझ्या लग्नानंतर पित्याच्या संपत्तीशी माझा कोणताही वाटा राहणार नसल्याचे लिहिले. पित्याने मुलीला प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगितल्यावर मुलीनेसुद्धा क्षणाचाही विचार न करता प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली. पिताही प्रतिज्ञापत्र घेऊन पोलिस ठाण्याच्या बाहेर पडले. या सर्व घटनेने पोलिस कर्मचारीही चक्रावून गेले होते. या घटनेची पोलिस कर्मचार्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.