ग्रामपातळीवर राबविणार विहिरी पुनर्भरणाची प्रात्यक्षिके

By Admin | Updated: February 15, 2016 02:07 IST2016-02-15T02:07:33+5:302016-02-15T02:07:33+5:30

१६ ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताहात शासन विविध उपक्रम राबविणार.

Demonstration of wells for rehabilitation will be implemented at the village level | ग्रामपातळीवर राबविणार विहिरी पुनर्भरणाची प्रात्यक्षिके

ग्रामपातळीवर राबविणार विहिरी पुनर्भरणाची प्रात्यक्षिके

अकोला: पर्यावरणाचा समतोल ढासळल्याने निसर्गचक्र बिघडले असून, पावसाचे प्रमाण कमी व अनिश्‍चित झाले आहे. त्यामुळे गत काही वर्षांपासून राज्यात पाणीटंचाईचे संकट वाढते आहे. पाणी वापर व पाण्याचे नियोजन याबाबत जनजागृती करण्यासाठी जलसंपदा विभागातर्फे १६ ते २२ मार्च हा सप्ताह 'जलजागृती सप्ताह' म्हणून साजरा करण्यात येणार असून, त्याअंतर्गत गावपातळीवर विहिरी तसेच विंधन विहिरींचे पुनर्भरण यासारखी प्रात्यक्षिके जिल्हा परिषदांमार्फत राबविण्यात येणार आहेत.
राज्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. तथापि, जनतेच्या सक्रिय सहभागाशिवाय पाण्याचा प्रश्न मिटू शकत नाही. त्यामुळे लोकांमध्ये पाण्याच्या वापराबाबत जागृती व्हावी, यासाठी २२ मार्च या जागतिक जलदिनाचे औचित्य साधून दरवर्षी १६ ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येतो. त्याअंतर्गत जलसंपदा विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, नगर विकास विभाग, पर्यावरण विभाग, उद्योग विभागांमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तशा सूचना जलसंपदा विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा, तालुका व गावपातळीवरील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमार्फत जलजागृती करण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'जलयुक्त शिवार' प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्याकरिता व ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत त्याची माहिती पोहचवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत तसेच जलसाक्षरता उपक्रम राबविण्यात येणार आहे. हे उपक्रम लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत तालुकास्तरावर व गावपातळीवर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये विहिरी पुनर्भरण, विंधन विहीर पुनर्भरण याची प्रात्यक्षिके ग्रामपातळीवर आयोजित करण्यात येणार आहेत. याशिवाय जलसंधारणाची कामे, जलयुक्त शिवार प्रकल्पांना भेटी व शिवारफेरी यांसारख्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

'जललेखा'संकल्पना रुजविणार
या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावाचा जललेखा तयार करण्यात येणार असून, त्याचे वाचन गावपातळीवर करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती नागरिकांना देऊन जनतेत जललेखा ही संकल्पना रुजविण्यात येणार आहे. याशिवाय गावांमधील बसस्थानक, चावडी, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा या सार्वजनिक ठिकाणी जलजागृतीसंदर्भातील घोषवाक्ये, भित्तिफलके लावण्यात येणार आहेत.

Web Title: Demonstration of wells for rehabilitation will be implemented at the village level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.