२९३ रुग्ण पॉझिटिव्ह चौघांचा मृत्यू
By Admin | Updated: November 14, 2014 00:50 IST2014-11-14T00:50:22+5:302014-11-14T00:50:22+5:30
यावर्षी ७ नोव्हेंबरपर्यंत शहरातील २९३ रुग्ण डेंग्यूच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आले असून यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. महानगरपालिकेने २३९६ रुग्णांचे रक्तजल नमुने गोळा गेले होते.

२९३ रुग्ण पॉझिटिव्ह चौघांचा मृत्यू
डेंग्यू अटॅक : हायकोर्टात मनपाकडून आकडेवारी सादर
नागपूर : यावर्षी ७ नोव्हेंबरपर्यंत शहरातील २९३ रुग्ण डेंग्यूच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आले असून यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. महानगरपालिकेने २३९६ रुग्णांचे रक्तजल नमुने गोळा गेले होते. ही आकडेवारी आज, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आली.
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शहरात सर्वत्र अस्वच्छता पसरली असून नागरिकांचे जीवन व आरोग्य धोक्यात आहे, याकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका पूनम प्राईड कॉन्डोमिनिअमचे अध्यक्ष एस. सी. बेरा यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याशिवाय वृत्तपत्रांमध्ये मनपाच्या निष्क्रियतेमुळे डेंग्यू झपाट्याने पसरत असल्याच्या बातम्या नियमित प्रकाशित होत आहेत. ही बाब लक्षात घेता गेल्या तारखेला न्यायालयाने शहरात डेंग्यूची काय स्थिती आहे व या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत, यावर माहिती सादर करण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिले होते. त्यानुसार मनपाने विस्तृत माहिती दिली असून त्यातून वरील आकडेवारी समोर आली आहे. याप्रकरणावर आता १९ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. स्वच्छ व आरोग्यवर्धक वातावरण हा नागरिकांचा घटनादत्त अधिकार आहे. परंतु, शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असेली कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट कंपनी आपले कर्तव्य योग्य रीतीने बजावण्यात अपयशी ठरत आहे. जैविक व अजैविक कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्या जात नाही. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. यामुळे डेंग्यूचा प्रकोप वाढून नागरिकांचे जीवन धोक्यात आल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
याचिकेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक, महानगरपालिका आयुक्त, कनक रिसोर्सेस आदींना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. देवेन चव्हाण, तर मनपातर्फे अॅड. एस. के. मिश्रा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
मनपाच्या उपाययोजना
जनजागृतीसाठी ३ लाख पत्रके, १५०० पोस्टर व बॅनरचे वाटप.
हत्तीरोग विभागाला डासअळीनाशक औषधाचा पुरेसा पुरवठा.
संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविणे.
व्हॉट्स अॅप व प्रसारमाध्यमांवरून डेंग्यूपासून संरक्षणाचा प्रचार.
मोठ्या डबक्यांमध्ये मासे सोडण्याची कार्यवाही सुरू आहे.
मनपा शाळांमध्ये लोक प्रशिक्षणाचे कार्य सुरू आहे.