निकृष्ट बियाणे, शेतक-यांना नुकसान भरपाई!
By Admin | Updated: August 21, 2015 22:44 IST2015-08-21T22:44:55+5:302015-08-21T22:44:55+5:30
ग्राहक मंचचे आदेश, महाबीजला दोन तर कृषिधनला दीड लाखाचा फटका.
_ns.jpg)
निकृष्ट बियाणे, शेतक-यांना नुकसान भरपाई!
अकोला :महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) व कृषिधन बियाणे कंपनीने दहीगाव गावंडे येथील शेतकर्यांना निकृष्ट दर्जाचे बियाणे विक्री केल्याप्रकरणी या दोन्ही कंपन्यांनी शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष एस. एम. उंटवाले यांनी शुक्रवारी दिले. महाबीजने १ लाख ९९ हजार ५00 रुपये तर कृषिधन कंपनीने १ लाख ५६ हजार रुपये नुकसान भरपाई शेतकर्यांना ४५ दिवसांच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. बियाणे पेरणी केल्यानंतर ९0 टक्के बियाणे उगवलेच नव्हते, अशी तक्रार या शेतकर्यांनी केली होती. दहीगाव गावंडे येथील शेतकरी नरेश सुरेश काळे यांनी २0१४ च्या खरीप हंगामासाठी महाबीजकडून सुमारे ३३ हजार ३९0 रुपयांच्या ३0 किलो वजनाच्या १४ बॅग सोयाबीन बियाणे खरेदी केली होती. त्यांची पत्नी नयना नरेश काळे यांनी कृषिधन कंपनीकडून २२ हजार ५00 रुपयांच्या ३0 किलो वजनाच्या ९ बॅग सोयाबीन बियाणे खरेदी केले होते. शेतीची पूर्ण मशागत करून आवश्यक पाऊस झाल्यानंतर काळे दाम्पत्याने एक हेक्टर ६२ आर शेतीमध्ये महाबीज, तर एक हेक्टर ६३ आर शेतीमध्ये कृषिधन कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली; मात्र ८ ते १0 दिवसांचा कालावधी उलटल्यावरदेखील दोन्ही शेतात केवळ ५ ते १0 टक्केच बियाणे उगवले. उर्वरित ९0 टक्के बियाणे न उगवल्यामुळे त्यांनी या प्रकरणाची तक्रार पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे केली. कृषी अधिकार्यांनी ४ ऑगस्ट २0१४ रोजी दोन्ही शेतीची पाहणी करून शेतातील तब्बल ९0 टक्के बियाणे उगवलेच नसल्याचा अहवाल दिला. या अहवालाच्या आधारे नरेश काळे व नयना काळे यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली. ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष एस. एम. उंटवाले यांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर नरेश काळे या शेतकर्याला महाबीज कंपनीने एक लाख ९९ हजार ५00 रुपये नुकसान भरपाई व ३ हजार रुपये न्यायिक खर्च देण्याचे आदेश दिले. यासोबतच नयना नरेश काळे या महिला शेतकर्याला कृषिधन बियाणे कंपनीने एक लाख ५६ हजार रुपये नुकसान भरपाई व ३ हजार रुपये न्यायिक खर्च देण्याचे आदेश तक्रार निवारण मंचने दिले. या दोन्ही शेतकर्यांना ही नुकसान भरपाई व खर्च ४५ दिवसांच्या आतमध्ये देण्यात यावा, सोबतच ८ टक्के व्याजही देण्याचे आदेश ग्राहक तक्रार निवारण मंचने दिले आहेत. या प्रकरणी शेतकर्यांतर्फे अँड. जयेश गावंडे पाटील व अँड. दिनेश पोरे यांनी, तर महाबीजतर्फे अँड. मो. परवेज डोकाडिया यांनी कामकाज पाहिले.