डहाणूच्या आदिवासीपाड्यांना ‘अच्छे दिन’ केव्हा?

By Admin | Updated: March 6, 2017 03:29 IST2017-03-06T03:29:38+5:302017-03-06T03:29:38+5:30

आदिवासी विकास खाते आदिवासींच्या विकासाचा डांगोरा पिटत असले तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे.

Dahanu's tribal wards 'good days' when? | डहाणूच्या आदिवासीपाड्यांना ‘अच्छे दिन’ केव्हा?

डहाणूच्या आदिवासीपाड्यांना ‘अच्छे दिन’ केव्हा?


डहाणू : आदिवासी विकास खाते आदिवासींच्या विकासाचा डांगोरा पिटत असले तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे. कच्चा रस्ता, पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट, विजेची सोय नसल्याने वर्षांनुवर्षे अंधारात चाचपडणारा चळणी ग्रामपंचायतीचा हुंबाचापाडा, गेटीपाडा, गावठाणपाडा या डहाणू तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्यांचा मूलभूत सुविधांसाठी आजही संघर्ष सुरुच आहे.
पूर्णपणे आदिवासी असलेल्या व जवळपास ३ ते ४ हजार लोकसंख्या असलेले हे पाडे कायमस्वरुपी निवारा, रस्ते, पाणी, वीजेच्या प्रतिक्षेत आहेत. डहाणूच्या दुर्गम भागातील हा आदिवासी मोलमजूरी करुन कुटुंब पोसतोे. त्यांना अद्यापही पक्की घरे नाहीत. शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ अनेकांना मिळालेला नाही. त्यामुळे अर्धी अधिक कुटुंबे वीट भट्ट्यांवरीरल रोजगार मिळविण्यासाठी स्थलांतरीत झाली आहेत. त्यांचे राहणीमान अत्यंत हलाखीचे आहे. शिक्षण, आरोग्य तसेच आवश्यक मूलभूत गरजांपासून वंचित असलेल्या या समाजाला मदतीची गरज आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या पलीकडील सायवन भागात किन्हवली, दाभाडी, सुखंडआंबा, चळणी, निंबापूर, सायवन, ही गावे आजही विकासापासून वंचितच आहे. तर मुलांना शिक्षणासाठी शासकीय आश्रमशाळांशिवाय पर्याय नाही. वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही तर अनेकांना शिक्षण सोडावे लागले आहे. डहाणू पंचायत समितीत कोणत्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जायचे असल्यास तब्बल १०० किमी अंतर जावे लागते. त्यासाठी अंदाजे २०० रुपये खर्च येतो. शिवाय दिवसही खर्च होतो. एका फेरीत काम झाले नाही तर पुन्हा हेलपाटे मारावे लागतात. डहाणू तहसीलदार, प्रांत कार्यालयाशी वेळोवेळी संपर्क साधू शकत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
> चळणी, किन्हवली, दाभाडी या भागात वाहतूक, शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. सरकारी अधिकारी याकडे फारसे गांभीर्याने पाहत नाहीत.परिणामी आदिवासींचा विकास रखडलेला आहे.
-राजेश पवार,
सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Dahanu's tribal wards 'good days' when?