वाढीव वीज बिलांमुळे ग्राहक हैराण
By Admin | Updated: September 10, 2016 02:00 IST2016-09-10T02:00:02+5:302016-09-10T02:00:02+5:30
महावितरण कंपनीकडून येणाऱ्या विजेच्या वारेमाप बिलांमुळे डोंबिवलीतील ग्राहक हैराण झाले आहेत.

वाढीव वीज बिलांमुळे ग्राहक हैराण
डोंबिवली : महावितरण कंपनीकडून येणाऱ्या विजेच्या वारेमाप बिलांमुळे डोंबिवलीतील ग्राहक हैराण झाले आहेत. त्यामुळे अशा ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपाने पुढाकार घेतला आहे. बिलांबाबत तक्रारी, शंका असल्यास पक्षाच्या कार्यालयाशी संपर्क साधा, असे आवाहन पक्षाचे पूर्व मंडल अध्यक्ष संजीव बीडवाडकर यांनी केले आहे.
बीडवाडकर आणि केडीएमसीच्या ‘ग’ प्रभाग समितीचे सभापती मुकुंद पेडणेकर यांनी दोन दिवसांपूर्वी महावितरणच्या भोंगळ कारभाराची पोलखोल करत एका ग्राहकाच्या बिलातील सुमारे ९०० रुपये कमी करून घेतले. या घटनेमुळे अधिकाऱ्यांची मर्जी असेल वाढीव बील तर कमी करता येते, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपाचे माजी नगरसेवक भाई देसाई यांनाही वाढीव बिलासंदर्भात शंका आल्याने त्यांनी बाजीप्रभू चौकातील महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावर वरिष्ठ निर्णय घेतील, असे कनिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे देसाई यांनी बीडवाडकर यांनी एमआयडीसीतील महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
देसार्इंनी समायोजित रक्कम म्हणजे काय, व ती का आकारली आहे, याचे स्पष्टीकरण मागितले. त्यावर अधिकारी निरुत्तर झाले. त्यांनी तातडीने त्यांच्या बिलातील ९०० रुपये रक्कम कमी केले, असे बीडवाडकर म्हणाले. यावरूनच समायोजीत रक्कम ग्राहकांवर लादली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिलासंदर्भात तक्रारी-शंका असल्यास ‘महावितरण’कडे दाद मागावी. तेथे समाधान न झाल्यास भाजपाच्या पूर्वेतील राथ रोडवरील कार्यालयात संपर्क साधावा, असे ते म्हणाले. त्यासाठी पक्षाने काढलेला फार्म भरून द्यावा.
कार्यकर्ते त्यांच्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न करतील. संबंधित अधिकाऱ्यांकडे त्याची दाद मागतील. त्यावरही समाधान न झाल्यास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दाद मागितली जाईल, असे बीडवाडकर म्हणाले. (प्रतिनिधी)
>समायोजित रक्कम
म्हणजे काय?
समायोजित रकमेबाबत बीडवाडकर म्हणाले की, विजेची गळती आणि त्यातील रकमेची तूट आकारण्याची विशेष तरतूद बिलात असते. बहुतांशी ग्राहकांच्या बिलात ती कमी-जास्त प्रमाणात असू शकते. पण कोणीतरी केलेल्या विजचोरीची तूट अथवा वीजगळतीचा भुर्दंड नियमित बिल भरणाऱ्यांना का, असा सवाल उपस्थित होत आहे. सर्वसामान्य ग्राहकांवरील अन्याय तातडीने दूर व्हावा, यासाठी ही मोहीम सुरू केली आहे, असे बीडवाडकर म्हणाले.