नियतीचे क्रौर्य

By Admin | Updated: June 9, 2014 01:13 IST2014-06-09T01:13:41+5:302014-06-09T01:13:41+5:30

मुले सोडून गेल्यानंतर आयुष्याची अखेर एकाकीपणे जगत असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला. वृद्धाचा उष्माघाताने तर वृद्धेचा भूक आणि तहान असह्य होऊन मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

The cruelty of the destiny | नियतीचे क्रौर्य

नियतीचे क्रौर्य

वृद्ध पतीचा उष्माघाताने तर पत्नीचा भूकबळी!
नागपूर : मुले सोडून गेल्यानंतर आयुष्याची अखेर एकाकीपणे जगत असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला. वृद्धाचा उष्माघाताने तर वृद्धेचा भूक  आणि तहान असह्य होऊन मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. हृदय हेलावून सोडणारी ही दुर्दैवी घटना शनिवारी पश्‍चिम नागपुरातील गिट्टीखदान  पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तनगर वसाहतीत उजेडात आली.
रशीद मोहम्मद नजीर मोहम्मद (६२) आणि त्यांची पत्नी बिल्किस बानो रशीद मोहम्मद (६१), असे या दुर्दैवी वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. ते गेल्या  दोन-तीन महिन्यांपासून भाड्याच्या घरात राहात होते.
गेल्या दोन दिवसांपासून मोहल्ल्यात दुर्गंधी सुटल्याने शेजार्‍यांनी काल सायंकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास गिट्टीखदान पोलिसांना सूचना दिली.  पोलिसांनी घटनास्थळ गाठले. दार आतून बंद होते. कसेबसे दार उघडताच वृद्ध दाम्पत्याचे मृतदेहच पोलिसांना दिसले. मृतदेह  काळपट पडलेले होते.  या मृतदेहांवर जागोजागी फोड दिसत होते. कुजलेले मृतदेह होते. खोलीतील पंखाही बंद पडलेला होता. घराला एकही व्हेंटिलेटर नव्हते.
प्राप्त माहितीनुसार उभे आयुष्य ट्रक चालवून रशीद मोहम्मद यांनी कुटुंबाला जगवले होते. कुटुंबाचा ते एकमेव आधार होते. बिल्किस बानो ही दोन्ही  डोळ्यांनी आंधळी होती. रशीद हे तिची काठीच होते. दोन मुलांपैकी एक ट्रक चालक तर दुसरा खासगी कंपनीत मार्केटिंग एजंट आहे. दोघेही विवाहित  आहेत. त्यापैकी मार्केटिंगची कामे करणारा लहान मुलगा आबिद हा कोराडीनजीक मूर्तीनगर येथे आपल्या सासर्‍याकडे राहतो. आयुष्यभर काबाडकष्ट  करून आता आधारहीन झालेले हे वृद्ध दाम्पत्य एकाकी आयुष्य जगत होते. लहान मुलगा आठ-दहा दिवसांतून एकदा केवळ पाहून जात होता.
दोन्ही डोळ्यांनी अधू बिल्किस ही आजारीही होती. त्यामुळे तिचे पती रशीदच तिला जेवण, पाणी द्यायचे. गेल्या आठवडाभरापासून उन्हाने कहरच  केलेला आहे. सूर्य नुसता आग ओकत आहे. अशा स्थितीत या घरात कूलर तर नव्हताच हळूहळू चालणारा पंखाही बंद पडलेला होता. त्यामुळे  चार-पाच दिवसांपूर्वीच वृद्ध रशीद मोहम्मद यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असावा. अन्न पाणी देणाराच या जगात नसल्याने भूक आणि तहानेने व्याकूळ  होऊन वृद्ध बिल्किस बानो हिचाही मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
घटनास्थळी खुद्द गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बोंडे, उपनिरीक्षक बघेले आणि ताफा दाखल झाला होता. दोन्ही मृतदेह  उत्तरीय तपासणीसाठी मेयो इस्पितळाकडे रवाना करण्यात आलेले आहेत. शवविच्छेदनानंतरच या वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूचा उलगडा होईल.  (प्रतिनिधी)
‘त्यांना’ अश्रू             आवरेना पण..
जन्मदात्या वृद्ध माता-पित्याला मृत्यूच्या दारात सोडून एकाकी आयुष्य जगण्यास भाग पाडणारी या वृद्धांची दोन्ही मुले, सुना या दुर्देवी मृत्यूनंतर  धायमोकलून रडत होते. त्यांच्या डोळ्यातील अश्रू आवरत नव्हते. दोन-तीन महिन्यापूर्वी या मुलांनी माता-पित्याचा एकप्रकारचा त्यागच केला होता.  मोहल्ल्यात नव्याने राहण्यास आलेल्या या वृद्धांची कुणाशी ओळखीही नव्हती. त्यामुळे ते कुणाला मदतही मागू शकत नव्हते. ते असहाय्य झाले होते.
 

Web Title: The cruelty of the destiny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.