पीक विमा काढण्याची मुदत वाढली!
By Admin | Updated: September 3, 2015 23:58 IST2015-09-03T23:58:40+5:302015-09-03T23:58:40+5:30
आता १५ सप्टेंबरपर्यंत काढता येईल पीक विमा, पण राज्याला फायदा काय?

पीक विमा काढण्याची मुदत वाढली!
अकोला : देशातील पाऊस व पिकांची स्थिती बघता केंद्रीय कृषी मंत्रालयाने पीक विमा काढण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. पण, या पीक विम्याचा महाराष्ट्रातील शेतकर्यांना फायदा काय, असा प्रश्न तज्ज्ञ शेतकर्यांकडून उपस्थित केला जात आहे. पश्चिम विदर्भातील पाच जिल्हय़ातील जवळपास ९ लाख शेतकर्यांनी ५0 कोटींच्यावर रक्कम भरू न पीक विमा काढला आहे. राज्यात ऑगस्ट अखेरपर्यंत १२७.८९ लाख म्हणजेच ९५ टक्के क्षेत्रावर विविध खरीप पिकांची पेरणी शेतकर्यांनी केली. पण, सतत पावसाचा खंड पडल्याने पिकांचे नुकसान झाले. शेतकर्यांना दुबार-तिबार पिकांची पेरणी करावी लागली. त्यामुळे शासनाने ७ ऑगस्टपर्यंत पीक विम्याची मुदत वाढ केली होती. तथापि ही मुदत वाढ जाहीर करताना १ ते ७ ऑगस्टपर्यंत ज्या शेतकर्यांनी पेरणी केली. केवळ त्याच शेतकर्यांना पीक विमा मुदत वाढीचा लाभ घेता येणार होता. परिणामी ज्या शेतकर्यांनी या तारखेच्या अगोदर पेरणी केली पण, पीक विमा काढला नव्हता, त्यांचा हिरमोड झाला. आता ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत ज्या शेतकर्यांनी पेरणी केली, त्यांना या पीक विम्याचा लाभ होईल का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, पावसाची अनिश्चितता बघता केंद्रीय कृषी मंत्रालयाने पीक विमा काढण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. पण, १ सप्टेंबरनंतर पेरणी करणार्या शेतकर्यांना या पीक विम्याचा फायदा होणार असेल तर या राज्यात आता पेरणी करणारे शेतकरी उरले कुठे, असा प्रश्न तज्ज्ञ शेतकर्यांकडून उपस्थित केला जात आहे.