संत्रा उत्पादकांपुढे ‘कोलेटोट्रीकम’ चे संकट
By Admin | Updated: August 20, 2014 01:08 IST2014-08-20T01:08:13+5:302014-08-20T01:08:13+5:30
अगोदरच अडचणीत सापडलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांपुढे आता ‘कोलेटोट्रीकम’ च्या स्वरूपात नवे संकट उभे ठाकले आहे. गत काही दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाला आहे. यामुळे जमिनीतील

संत्रा उत्पादकांपुढे ‘कोलेटोट्रीकम’ चे संकट
दुहेरी फटका : एनआरसीसीच्या तज्ज्ञांनी घेतला आढावा
नागपूर : अगोदरच अडचणीत सापडलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांपुढे आता ‘कोलेटोट्रीकम’ च्या स्वरूपात नवे संकट उभे ठाकले आहे. गत काही दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाला आहे. यामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊन संत्रा पिकावर ‘कोलेटोट्रीकम’ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यात झाडावरील संत्र्याची मोठ्या प्रमाणात गळ होऊ लागली आहे.
यावर राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राचे (एनआरसीसी) संचालक डॉ. मिलिंद लदानिया यांनी तज्ज्ञांच्या चमूसह अलीकडेच नागपूर व अमरावती जिल्ह्यातील कळमेश्वर, काटोल, वरुड, जरुड, चांदूरबाजार, मोर्शी व परतवाडा येथील संत्रा बागांना भेटी देऊन, तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
डॉ. लदानिया यांच्या मते, सध्या या सर्व भागात आंबिया बहाराची फळे लागलेली आहेत. मात्र गत २० ते २५ दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली आहे.
शिवाय पावसाच्या आशेवर बसून असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी विहिरीवरील ओलिताची साधने काढून ठेवली आहेत. यामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊ न, जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत.
त्याचा परिणाम म्हणून ‘कोलेटोट्रीकम’ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. विशेष म्हणजे, उशिरा आलेल्या पावसामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत सापडला आहे.
अनेक शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली आहे. यात आता ‘कोलेटोट्रीकम’ या रोगाच्या स्वरूपात नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. (प्रतिनिधी)
काय आहे, ‘कोलेटोट्रीकम’
एनआरसीसीतील तज्ज्ञांच्या मते, ‘कोलेटोट्रीकम’ हा बुरशीजन्य रोग आहे. याचा प्रादुर्भाव झालेल्या संत्रा झाडावरील फळाचे देठ व फांदी वाळते. यामुळे फळे पिवळी पडून, त्यांची गळ होऊ लागते. या रोगापासून संत्र्याचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या संत्रा बागेला ताबडतोब पाणी व अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. तसेच फळांची अधिक गळती होत असल्यास कार्बन्डेझीम, थायोफनेट मिथाईल किंवा बेनोमील या बुरशीनाशकांची कॅल्शियम नायट्रेडसह फवारणी करून, गरज भासल्यास पुढील १० ते १५ दिवसानंतर पुन्हा दुसरी फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.