विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचे संकट
By Admin | Updated: June 20, 2014 00:56 IST2014-06-20T00:56:14+5:302014-06-20T00:56:14+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने लावलेल्या ५० टक्के शिक्षक भरतीच्या अटीचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्याचा दबाव असताना आर्थिक नुकसान

विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचे संकट
विना अनुदानित जागांवर प्रवेशास नकार : महाविद्यालयांचा सावध पवित्रा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने लावलेल्या ५० टक्के शिक्षक भरतीच्या अटीचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्याचा दबाव असताना आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बऱ्याच महाविद्यालयांनी विना अनुदानित तुकड्यांतील जागांवर प्रवेश देणे थांबविले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अगोदरच बारावीचा लागलेला विक्रमी निकाल आणि त्यातच महाविद्यालयांकडून घेण्यात येत असलेली ही भूमिका यामुळे अनेक विद्यार्थी अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. नामवंत महाविद्यालयांत तर प्रवेश मिळविताना विद्यार्थ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे.
२ जून रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला. यंदा संपूर्ण विभागाच्या निकालाची आकडेवारी ८९.०७ टक्के इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात चक्क १५.९७ टक्क्यांची वाढ झाली. शिवाय प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतदेखील वाढ झाली. अभियांत्रिकी व वैैद्यकीय अभ्यासक्रमांना न जाणाऱ्या विद्यार्थ्यांची विज्ञान व वा़णिज्य शाखेसाठी कल दिसून येत आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांचा अद्यापही प्रवेश झालेला नाही. प्रवेशासाठी महाविद्यालयांत गेल्यावर त्यांना नकारघंटा मिळत आहे. त्यामुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांसमोर ‘प्रवेश घ्यायचा कुठे’ असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यापीठाने मागील महिन्यात जारी केलेल्या अधिसूचनेमुळे महाविद्यालयांनी सावध पवित्रा घेतला आहे. २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी महाविद्यालयांत मंजूर क्षमतेच्या ५० टक्के पूर्णकालीन शिक्षकांची नियुक्ती करण्याची अट विद्यापीठाने लावली आहे. पारंपरिक, व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्व महाविद्यालयांना ही अट आहे. विज्ञान शाखेत विषयनिहाय शिक्षकांच्या नेमणुका करणे आवश्यक राहणार आहे. सर्व महाविद्यालयांनी कालांतराने १०० टक्के पूर्णकालीन शिक्षकांची नेमणूक करावी, असे निर्देश विद्यापीठाने दिले होते. जी महाविद्यालये संबंधित अटींचे पालन करणार नाहीत त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा विद्यापीठाने दिला होता. २५० महाविद्यालयांच्या प्रवेशबंदीचा गुंता अद्याप सुटला नसल्याने त्या महाविद्यालयांत प्रवेश बंदच आहेत. त्यातच ही अधिसूचना आल्यामुळे महाविद्यालयांनी सावध पवित्रा घेतला आहे. अनुदानित तुकड्यांमधील प्रवेश सुरू असले तरी विनाअनुदानित तत्त्वावरील तुकड्यांमधील प्रवेश मात्र महाविद्यालयांनी थांबविला आहे. या तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला तर किमान ५० टक्के शिक्षकांची नियुक्ती करावी लागेल. या शिक्षकांना वेतन देण्यातच बहुतांश रक्कम खर्च होईल. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना इतर सुविधा पुरविता येणार नाही. शिवाय महाविद्यालयांना आर्थिक फटका सहन करावा लागेल तो वेगळाच. त्यामुळे आम्ही सध्या प्रवेश न देण्याची भूमिका घेतल्याचे एका विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.(प्रतिनिधी)