सर्वांगीण विकासातून राष्ट्र निर्माण
By Admin | Updated: June 22, 2014 00:59 IST2014-06-22T00:59:37+5:302014-06-22T00:59:37+5:30
सामूहिक योगदान आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून राष्ट्र निर्माण करण्याचे ध्येय ठेवून परिवर्तन यात्रा सुरू केली असून सामाजिक उत्थान, शैक्षणिक विकास आणि आपदा प्रबंधन हे

सर्वांगीण विकासातून राष्ट्र निर्माण
प्रफुल्ल पारख यांचे वक्तव्य : भारतीय जैन संघटनेची परिवर्तन यात्रा
नागपूर : सामूहिक योगदान आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून राष्ट्र निर्माण करण्याचे ध्येय ठेवून परिवर्तन यात्रा सुरू केली असून सामाजिक उत्थान, शैक्षणिक विकास आणि आपदा प्रबंधन हे कार्यक्षेत्र असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे (बीजेएस) राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
‘नई पिढी-नई सोच’ घोषवाक्य
भारतीय जैन संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष पारख हे देशव्यापी दौऱ्यावर आहेत. सिव्हिल लाईन्स, उद्योग भवनातील व्हीआयएच्या सभागृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘नई पिढी-नई सोच’ असे घोषवाक्य घेऊन त्यांची यात्रा सुरू आहे. पारख यांनी सांगितले की, सामाजिक, शैक्षणिक आणि नैतिक मूल्यांच्या आधारावर एक नवीन पिढी तयार करण्याचे कार्य ‘बीजेएस’ करीत आहे. परिवर्तन यात्रा ३१ मार्च ते ७ सप्टेंबर २०१४ यादरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यात जाईल. महाराष्ट्रात २२ ते २९ जून असा कालावधी आहे. जवळपास २२५ सभा होणार आहेत.
त्यासाठी एक हजार शिक्षण संस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे. एका वर्षात पाच लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहोत.
सामाजिक उत्थानावर भर
परिवर्तनाच्या या युगात आपल्या पाल्याच्या प्रतिभांचे आकलन करून त्यांच्या शिक्षणासाठी चर्चा आणि समाधान तसेच विदेशी संस्कृतीचा वाढता प्रभाव आणि आपल्या मुलीशी आपला व्यवहार, त्यांच्या अपेक्षा आमची चिंता, त्यांचे भविष्य आमच्या अपेक्षा, त्यांच्या स्वातंत्र्यावर चर्चा व समाधान हे मुद्दे परिवर्तन यात्रेत चर्चेत राहतील. विवाहाचे गंभीर प्रश्न, वाढते वय, विवाह जुळविण्याच्या जुन्या पद्धती, शिक्षणात वाढते अंतर, वाढत्या अपेक्षांमुळे आंतरजातीय विवाहावर चर्चा होणार आहे.
पारख यांनी सांगितले की, आपण जुन्या कोर्सच्या माध्यमातून शिक्षक तयार करीत आहोत. सध्याच्या शिक्षण पद्धतीवर टीका करताना पंतप्रधान मोदींनी आपल्याला शिक्षक तयार करावे लागेल, असे सूचक वक्तव्य केले आहे.
विशेषत: पारंपरिक व्यवसायात नव्या पिढीची घटती रुची, जुन्या व्यवसायाच्या अस्तित्वाचा प्रश्न, मॉल संस्कृतीचा प्रभाव, व्यवसायाच्या नवीन संधीकडे दुर्लक्ष, नवीन पिढीच्या कार्यक्षमतेचा पूर्ण उपयोग न होणे या गंभीर विषयावर चर्चा करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न परिवर्तन यात्रेत करण्यात येणार असल्याचे पारख यांनी सांगितले.
पत्रपरिषदेत भारतीय जैन संघटनेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष अतुल कोटेचा, सचिव रवींद्र आग्रेकर, पूर्व विदर्भ विभाग अध्यक्ष रमेश कोचर, सचिव विजय उदापूरकर यांच्यासह दिलीप रांका, प्रकाश मारवडकर, प्रशांत सवाने, डॉ. नरेंद्र भुसारी, दीपक शेंडेकर, अनिल पारख, दुर्वेश मोघे, मयूर दायमा, लोकेश बरडिया आणि सुनील गोलछा उपस्थित होते. (प्रतिनिधी)