देशाला हिंदू राष्ट्र जाहीर करा !

By Admin | Updated: October 23, 2015 04:18 IST2015-10-23T04:13:15+5:302015-10-23T04:18:22+5:30

देशाची मान शाई टाकण्यामुळे नाही, तर दादरी हत्याकांडामुळे खाली गेली, असा टोला भाजपाला लगावतानाच गोमांसाची आवई उठवण्यापेक्षा देशाला हिंदू राष्ट्र जाहीर करा आणि समान नागरी

A country should declare a Hindu nation! | देशाला हिंदू राष्ट्र जाहीर करा !

देशाला हिंदू राष्ट्र जाहीर करा !

उद्धव यांचे मोदींना आव्हान : गाईवर नव्हे महागाईवर चर्चा करा

मुंबई : देशाची मान शाई टाकण्यामुळे नाही, तर दादरी हत्याकांडामुळे खाली गेली, असा टोला भाजपाला लगावतानाच गोमांसाची आवई उठवण्यापेक्षा देशाला हिंदू राष्ट्र जाहीर करा आणि समान नागरी कायदा लागू करा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी ललकारले.
शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. त्या वेळी ठाकरे यांनी हिंदुत्व व महागाई या दोन प्रमुख मुद्द्यांवरून केंद्र व राज्य सरकारला धारेवर धरले. मात्र कुठल्याही परिस्थितीत सत्ता सोडणार नाही, असेही स्पष्ट केले. गाईवर नव्हे, तर महागाईवर चर्चा करा. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार असताना पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे कसे स्थिर ठेवले होते. मग आताच ते का जमत नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला. सत्तेत असताना महागाईवर लक्ष नसेल तर मी जनतेला तोंड दाखवू शकत नाही. इतका निर्लज्ज मी नाही.
शिवसेना पाकिस्तानबद्दल बोलली तर भाजपाच्या पोटात का दुखते, असा प्रश्न ठाकरे यांनी केला. गर्वसे कहो हम हिंदू है, असे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे आणि देवळातील घंटा बडवण्याचे नाही तर अतिरेक्यांना बडवणारे आहे, असा चिमटा ठाकरे यांनी संघ परिवाराला घेतला. ‘मंदिर वही बनायेंगे लेकीन तारीख नही बतायेंगे’ अशा शब्दांत भाजपाच्या फसलेल्या राम मंदिर आंदोलनाचा समाचार घेताना रामाने लंकेत घुसून जसा रावणाचा मुडदा पाडला तसा पाकचा पाडा, असा सल्ला त्यांनी दिला. मुफ्ती महंमद सईद जर तुम्हाला चालत असतील तर शिवसेनेचेही थोडे ऐका, असा टोलाही त्यांनी लगावला. मला वाद नको आहे. देशातील सरकार ही जनतेची शेवटची आशा आहे. ते सरकार नालायक ठरले तर देशाची काय अवस्था होईल ते मला माहित नाही, असे सांगत ठाकरे म्हणाले की, आम्ही टीका केली की लागलीच सत्तेतून कधी बाहेर पडणार हे विचारले जाते. सगळे चांगले झाले की आम्ही सत्तेतून बाहेर पडू. सत्तेत किती काळ राहायचे ते आम्हाला चांगले
कळते. मात्र हे बजावत असतानाच ठाकरे यांनी विधानसभेवर भगवा फडकवून दाखवीन असेही जाहीर केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पाकिस्तानी कलाकार व क्रिकेटपटू यांना संरक्षण देण्याची जी भाषा केली त्याची खिल्ली उडवताना वेदात काय म्हटले आहे ते तुम्ही सांगा, पण आम्ही वेडात धावणारे मराठे आहोत, असे मत व्यक्त केले.
(विशेष प्रतिनिधी)

...तर इंदू मिलचे
भूमिपूजन कशाला केले?
हरियाणात भाजपाची सत्ता असतानाही दलित हत्याकांड घडले. त्यावर बोलताना केंद्रीयमंत्री व्ही. के. सिंग यांनी दलितांची तुलना कुत्र्याशी केली. दलितांबद्दल तुमच्या या भावना आहेत तर इंदू मिलचे भूमिपूजन कशाला केले? असली ढोंगं कशाला करता, असा सवाल ठाकरे यांनी केला.

शरद पवारांनी स्वाभिमान शिकवू नये
शरद पवार यांचा समाचार घेताना शिवसेनाप्रमुख त्यांना काय म्हणायचे ते मी बोलू का, असा सवाल करीत मी सभ्यपणाच्या मर्यादा पाळतो. पण माझ्या तोंडून तो शब्द गेला तर बोलू नका, असे सांगत पवार यांनी स्वाभिमान शिकवू नये, असा टोला लगावला.

Web Title: A country should declare a Hindu nation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.