कापूस, सोयाबीन दरात घसरण!
By Admin | Updated: January 29, 2015 23:25 IST2015-01-29T23:25:23+5:302015-01-29T23:25:23+5:30
राज्यातील शेतक-यांना दरवाढीची प्रतीक्षा.

कापूस, सोयाबीन दरात घसरण!
अकोला : अल्प पावसामुळे यंदा कापूस उत्पादकांच्या पदरी निराशा आली असून, कापसाचा एकरी उतारा कमी झाल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या परिस्थितीत हमीभाव शेतकर्यांना तारतील, अशी अपेक्षा होती; परंतु हमीभावात यावर्षी वाढ झाली नसून, खासगी बाजारातील कापसाचे दर शेतकर्यांना परवडणारे नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीनच्या दरातही या महिन्यात प्रति क्विंटल शंभर ते सव्वाशे रुपये घट झाल्याने शेतकर्यांची आर्थिक कोंडी होत आहे; पण चांगले भाव मिळतील, या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग आस लावून बसला आहे.
गतवर्षीच्या अतवृष्टीने सोयाबीन पीक हातचे गेले, यावर्षी पाऊसच नसल्याने कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांना मोठा फटका बसला आहे. उत्पादन खर्च तरी निघेल, या आशेवर शेतकरी असताना, जानेवारी महिन्यात खासगी बाजारात ३३00 रुपये प्रतिक्विंटल असलेले सोयाबीनचे दर १00 ते १२५ रुपयांनी घसरले. हमी दर २६५0 ते २८00 रुपये प्रतिक्विंटलच्यावर सरकत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
कापसाचे हमी दर ४0५0 रूपये प्रतिक्विंटल आहेत, पण प्रतवारीचे निकष लावून शेतकर्यांना ३९00 रुपये प्रतिक्विंटल दर दिले जात आहेत. याच दराने भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) राज्यात ५५ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. महाराष्ट्र सोडला, तर इतर राज्य मिळून सीसीआयने देशात तीन क्विंटल कापूस खरेदी केला आहे.
सोयाबीन आणि कापसाचे भाव खासगी बाजारात कमी झाले असून, कापसाचे भाव वाढतील, अशी सध्यातरी कोणतीच शक्यता दिसत नाही. जगाच्या तुलनेत भारतातील हे दर बरेच म्हणावे लागतील, असा निष्कर्ष अकोला येथील कापूस व्यावसायिक बसंत बाछुका यांनी काढला.